विधान परिषदेतील ९ आमदारांना निरोप !

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभात ९ सदस्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतीसुमने, राजकीय टोलेबाजी आणि शायरीची रीघ ओढली.