Mumbai Traffic AI : मुंबईतील वाहतूक व्यवस्था कृत्रिम बुद्धीमत्तेच्या नियंत्रणात !

  • प्रणालीद्वारे वाहतूककोंडीचे नियंत्रण  

  • मानवविरहित दंडात्मक कारवाईही शक्य

मुंबई – मार्च २०२६ पासून मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआयच्या) नियंत्रणाखाली आली आहे. ही प्रणाली मुंबई वाहतूक पोलिसांच्या ई-चलन प्रणालीशी जोडली गेली आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे आणि मार्गिकेचे (लेनचे) उल्लंघन करणे हे प्रकार या प्रणालीच्या लगेच लक्षात येतात आणि मानवी हस्तक्षेपाविना दंडात्मक कारवाईही केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ‘एआय’वर आधारित वाहतूक व्यवस्थापन योजनेला वेग दिला. ‘ब्लॅक स्पॉट्स’ (वाहतूक नियंत्रणाची पारंपरिक साधने अपुरी पडणारे ठिकाण) असलेल्या ठिकाणच्या समस्या सोडवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि चांदिवली आदी भागांमध्ये या प्रणालीची विशेष कार्यवाही केली जात आहे.

नव्या वाहतूक प्रणालीचे लाभ !

१. या प्रणालीला मानवी मर्यादा नाहीत. त्यामुळे जागोजागी बसवलेल्या कॅमेर्‍यांमधून एआय वाहनांची संख्या, घनता आणि रांगेची लांबीही मोजते.

२. ही प्रणाली वाहतूककोंडी नियंत्रित करते. एखाद्या रस्त्यावर २ किलोमीटर लांब वाहतूककोंडी झालेली आहे; पण दुसर्‍या बाजूला केवळ तीनच रिक्शा आहेत. अशा वेळी ही प्रणाली रिकाम्या मार्गिकेचा ‘हिरवा वेळ’ न्यून करून तो गर्दी असलेल्या मार्गाला देते. हे अवघ्या काही सेकंदांत घडते.

३. ही प्रणाली केवळ वर्तमानावर काम करत नाही, तर ती भविष्याचा अंदाजही घेते. १५ मिनिटांनी कुठे वाहतूककोंडी होणार आहे, हे आधीच समजते. यानुसार ‘ग्रीन वेव्ह’ (सलग हिरवा सिग्नल ठेवणे) द्वारे वाहतूक मोकळी केली जाते.

४. एखाद्या रस्त्यात प्रत्येक मंगळवारी सकाळी वाहतूककोंडी होत असेल, तर पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी तेथील सिग्नलचा वेळ आधीच पालटतो.

५. अंधेरी पूर्व-पश्चिम रस्त्यांवरील प्राथमिक चाचण्यांमध्ये १२ ते १८ टक्क्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी न्यून झाला असल्याचे आढळले आहे.  

संपादकीय भूमिका

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य प्रयत्न !