ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात १३६ जणांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

मार्गदर्शन करतांना श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव, समवेत अन्य मान्यवर

भुवनेश्वर (ओडिशा) – कालाहांडी जिल्ह्यातील बिरिमुहान या दुर्गम वनवासी गावातील पूर्वी धर्मांतर केलेल्या १३६ जणांनी त्यांच्या पूर्वजांच्या सनातन हिंदु धर्मात नुकताच पुनर्प्रवेश केला. ‘धर्म जागरण समन्वय विभाग, ओडिशा’च्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या समारंभात पारंपरिक विधी, मंत्रांचे उच्चारण आणि पादप्रक्षालन करून त्यांचे हिंदु धर्मात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) चळवळीचे अखिल भारतीय प्रमुख श्री प्रबल प्रताप सिंह जुदेव उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना ते म्हणाले, ‘‘आज आपण स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांना आदरांजली अर्पण करत आहोत. त्यांनी ओडिशाच्या आदिवासीबहुल फुलबाणी (कंधमाल) जिल्ह्यात सनातन श्रद्धेपासून दुरावलेल्या वनवासी समुदायांना पुन्हा हिंदु धर्माच्या प्रवाहात आणण्यासाठी अफाट प्रयत्न केले; मात्र ऑगस्ट २००८ मध्ये ‘धर्मांतर माफियां’नी  कट रचून त्यांची हत्या केली. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचे आदर्श आणि कार्य आम्ही सदैव जिवंत ठेवू’, असा निर्धार श्री. जुदेव यांनी व्यक्त केला.

आदिवासी महिलेचे पाय धुतांना श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव

कालाहांडी हा प्रदेश धर्मांतराचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. राष्ट्रविरोधी शक्तींनी स्थानिक आदिवासी समुदायांच्या सामाजिक-आर्थिक मागासलेपणाचा अपलाभ उठवत दीर्घकाळापासून धर्मांतराचे कार्य चालवले आहे. हा ‘घरवापसी’ कार्यक्रम या संपूर्ण प्रदेशात अत्यंत महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिला जात आहे.

या प्रसंगी पूजनीय स्वामी जनकानंद गिरी महाराज, संन्यासी कुंजदेव मनीषी, धर्म जागरणचे क्षेत्रीय प्रमुख विनय कुमार भुईया, ओडिशा राज्याचे प्रमुख वीर विक्रम आचार्य,    संतोषकुमार पांडा, प्रकाशचंद्र ठाकूर, आर्य समाजाचे कपिलदेव शास्त्री, सनातनी योद्धा विवेक अग्रवाल, समीर कुलकर्णी, सतीश मिश्रा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.