ई-रिक्शा आणि ई-बाईक यांसाठी परवाना बंधनकारक ! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – राज्यात प्रवासी वाहतूक करणार्‍या ई-रिक्शा आणि ई-बाईक यांसाठीही परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. केंद्रशासनाच्या अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक रिक्शा, टॅक्सी, तसेच इलेक्ट्रिक रिक्शा या सर्व वाहनांसाठी समान नियम लागू रहातील. प्रवासी वाहतुकीत पारदर्शकता वाढवणे आणि अनियमितता टाळणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

परमिट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन विभागाकडून ‘एक खिडकी योजना’ चालू करण्याची सिद्धता करण्यात येत आहे. ‘या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीत शिस्त निर्माण होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित सेवा मिळण्यास साहाय्य होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.