अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा-काजू पिकांच्या हानीविषयी ठोस निर्णय घेऊ ! – भरतशेठ गोगावले, फलोत्पादनमंत्री

आंबा-काजू पिक

मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – कोकणातील आंबा-काजू पिकांच्या हानीविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ. यामध्ये शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्याविषयी ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे फलोत्पादनमंत्री भरतशेठ गोगावले यांनी ६ मार्चला विधानसभेत दिली. अवेळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू यांचा मोहोर पडल्यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी, याविषयी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर गोगावले यांनी वरील आश्वासन दिले. या वेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव, सुनील प्रभु यांनी हानीभरपाईची मागणी सभागृहात केली. सुनील प्रभु यांनी हेक्टरी ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणी केली. यावर ‘बैठकीत योग्य तोडगा काढू’, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.