राज्यातील ३०० हून अधिक नागरिक मध्यपूर्वेतून मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत !

इराण-अमेरिका संघर्षामुळे विमानसेवा बंद

सांगली – मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील ३०० पेक्षा अधिक नागरिक दुबईत अडकले आहेत. इराण-अमेरिका संघर्षामुळे विमानसेवा बंद झाली असून नागरिकांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. भारत सरकारने हस्तक्षेप करून विशेष विमानसेवा किंवा पर्यायी व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणावे, अशी मागणी केली आहे. अडकलेल्या नागरिकांमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, धुळे, जळगाव, पुणे, बारामती येथील नागरिक आहेत. स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक सुविधा आणि साहाय्य दिले जात आहे. भारत सरकारने हस्तक्षेप करून विशेष विमानसेवेची मागणी केली आहे. आखातातून काही विमानांतून नागरिक परत आले आहेत. अधिक माहितीसाठी नियंत्रण संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (मंत्रालय नियंत्रण कक्ष क्र. ९३२१५८७१४३, व्हॉट्सॲप क्र. +९७१५०३६५४३५७)

युद्धामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी भारतीय विमान आस्थापनांना उड्डाणे वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विशेष आणि नियमित उड्डाणांचे नवीन वेळापत्रक घोषित केले आहे. ५ मार्चच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकृत माहितीनुसार ‘इंद्रजीत स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज्’चे ८४ विद्यार्थी आणि ४ शिक्षक यांसह पुणे येथील १११ नागरिक सुरक्षितपणे दुबईतून परतले आहेत, तसेच सांगली येथील ४७ नागरिक परत आले आहेत.