महाराष्ट्रातील द्राक्षे, कांदा, तांदूळ, केळी यांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम !

  • मध्यपूर्वेत चालू असलेल्या युद्धाचा परिणाम

  • अनेक उत्पादनांचे ‘कंटेनर’ अडकले

मुंबई – अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे. जे.एन्.पी.टी. बंदरात द्राक्षांचे कंटेनर (मोठी मालवाहू लोखंडी पेटी) अडकले आहेत. बंदरावर कांदा, तांदूळ, केळी आणि अन्य शेतीमालाच्या कंटेनरचीही गर्दी झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र परिस्थिती आता सुरळीत होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली.

१. ३५० कंटेनर द्राक्षे सध्या सांगलीच्या ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये आहेत, तर ७०० हून अधिक कंटेनर एवढी द्राक्षे बागेतच आहेत. मुंबईच्या बंदरात द्राक्षांचे ३०० कंटेनर थांबून आहेत. त्यामुळे जवळपास १५ सहस्र टन द्राक्षे आखाती देशांत जाण्यापासून थांबली आहेत. एकूणच द्राक्षांची निर्यात कशी करायची, हा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

२. लातूरवरून निर्यात केलेला शेकडो टन माल इराणच्या बंदरात पडून आहे. त्यामुळे लातूरच्या व्यापार्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

३. जळगाव जिल्ह्यातील १०० हून अधिक केळीचे कंटेनर जे.एन्.पी.टी. बंदरात अडकले आहेत. रमझानचा महिना चालू असल्याने केळ्यांना अडीच सहस्र रुपयांपर्यंत दर मिळत होता; मात्र युद्धामुळे आता केवळ १ सहस्र ते १ सहस्र ५०० रुपयांइतकाच दर मिळत आहे.