आतंकवादविरोधी पथकाने ९ मासांपूर्वी सूची पाठवूनही एकाही जिल्ह्याकडून अहवाल नाही !

बांगलादेशी घुसखोरांची नावे शोधण्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची अनास्था !

बांगलादेशी घुसखोरांची नावे शोधण्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची अनास्था

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – राज्यात २०२४ आणि २०२५ या २ वर्षांत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पोलिसांनी १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोरांना पकडले. राज्यातील शिधापत्रिकांमध्ये यांतील घुसखोरांची नावे आहेत का ?, याची पडताळणी करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाने मे २०२५ मध्ये त्यांच्या नावांची सूची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पाठवली. विभागाने ही सूची राज्यातील सर्व जिल्हा पुरवठादारांना पाठवली आहे; परंतु ९ मास होऊन गेले, तरी शिधापत्रिकांवर या घुसखोरांची नावे आहेत कि नाहीत ?, याविषयी एकाही जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही. यावरून लाभधारक बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची पडताळणी करण्याविषयी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची अनास्थाच दिसून येते.

१. आतंकवादविरोधी पथकाने पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी अनेकांकडे शिधापत्रिका आढळल्या आहेत; मात्र अन्यही घुसखोरांकडेही मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाने ही नावे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे पाठवली होती.

. या नावांचा शोध घेऊन त्यांच्या शिधापत्रिका रहित करणे ही प्रक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला करावयाची आहे.

३. वर्ष २०२५ नंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. त्यांची सूचीही आतंकवादविरोधी पथकाने सिद्ध केली आहे; परंतु ९ मासांपूर्वी पाठवलेल्या बांगलादेशी घुसखारांविषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

४. फेब्रुवारी २०२६ मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने बांगलादेशी घुसखोरांच्या नावांचा शोध घेण्याविषयी स्मरणपत्र पाठवले; मात्र त्यालाही १ मास होऊन गेला; पण अद्याप माहिती मिळालेली नाही.

संपादकीय भूमिका

असे असेल, तर घुसखोरांची नावे शोधणार कधी ? त्यांच्यावर कारवाई होणार कधी ? आणि त्यांना त्यांच्या देशात पाठवणार कधी ? हे केवळ प्रश्नच रहातील ! ही स्थिती बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढण्यालाच कारणीभूत ठरेल !