प्रतिकूल परिस्थितीत लोकांना संघटनाचे महत्त्व लक्षात येईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रीय समुदायाच्या पदाधिकार्‍यांसह सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे

कोटा (राजस्थान) – समाज कधी समान विचारांनी, तर कधी दुःख आणि संकट  यांमुळे संघटित होतो. ज्या लोकांना आज समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटित होण्याचे  महत्त्व समजत नाही, त्यांनाही प्रतिकूल परिस्थितीत त्याचे महत्त्व समजेल. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सतत प्रयत्न करत रहाणे, हा समाजनिर्मितीचा मूलमंत्र आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथे नुकतीच महाराष्ट्रीय समुदायाच्या पदाधिकार्‍यांची एक बैठक झाली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या पत्नी डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे याही उपस्थित होत्या.

श्री. आनंद जाखोटिया यांचा सत्कार करतांना महाराष्ट्रीय समुदायाचे पदाधिकारी

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘समाजासाठी काम करतांना अनेक समस्या आणि आव्हाने यांना तोंड द्यावे लागते. सकारात्मक विचार आणि उदात्त कार्य स्वतःचे घर अन् समाज येथूनच चालू करावी लागतात. त्यामुळे संघर्ष होणे स्वाभाविक आहे. प्रभु श्रीराम, कौरव-पांडव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे आपल्याला संघर्षाचा आदर्श मार्ग शिकवतात. हा मार्ग आपल्याला समाज, संस्कृती आणि धर्म यांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाष संच आणि ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ यांवरील आकर्षणामुळे कुटुंब, पालक अन् समाज यांचे महत्त्व न्यून होत आहे. कठीण काळात आत्मबळ आणि कुटुंब अन् समाज यांच्याकडून मिळणारे मनोबल यांचाच खरा आधार असतो.’’