५० टक्के मान्यताप्राप्त प्राध्यापक नसल्यास शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशबंदीची चेतावणी !

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

  • प्राध्यापक भरतीसाठी ३१ मार्च २०२६ ची समयमर्यादा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये नियमित आणि तात्पुरते नियुक्त झालेले अन् विद्यापिठाची मान्यता असलेले असे एकत्रित किमान ५० टक्के शिक्षक असणे आवश्यक आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२६ अशी समयमर्यादा दिली आहे. या समयमर्यादेत प्राध्यापकांची भरती न केल्यास परिसंस्थेमधील संबंधित अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्गाचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी चेतावणी विद्यापिठाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी यांनी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिली आहे.

विद्यापीठ आणि राज्यशासन यांनी ठरवल्याप्रमाणे प्राध्यापकांची संख्या असणे आणि अभ्यास पाठ्यक्रम, अध्ययन, प्रशिक्षण अन् संशोधन यांसाठी कार्यक्षमतेने योग्य ती उपाययोजना पुरेशी असणे बंधनकारक आहे. ही संलग्नीकरण, तसेच मान्यता याकरताची अट असून त्याचे अनुपालन करणे संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांना बंधनकारक असते.