अमेरिकेसमवेतच्या व्यापार करारामुळे शेतकर्‍यांची हानी होणार नाही ! – Piyush Goyal

  • केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडली सरकारची भूमिका

  • विरोधी पक्षांकडून गदारोळ

केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल (छायाचित्र सौजन्य : संसद टीवी)

नवी देहली – अमेरिकेसमवेत करण्यात आलेला व्यापार करार लघु आणि मध्यम उद्योजक, औद्योगिक घटक, कुशल कामगार अन् उद्योग यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करेल. प्रगत तंत्रज्ञानापर्यंत पोच सुलभ होईल. ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात उत्पादन), ‘डिझाइन इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात रचना) आणि ‘इनोव्हेट इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात नवोन्मेष) या उद्दिष्टांना गती मिळेल. यात खत आणि कृषी यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये भारताच्या हितांचे पूर्ण संरक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत दिली. गोयल यांचे वक्तव्य चालू असतांना लोकसभेत विरोधकांकडून गदारोळ केला जात होता. तरीही राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देत चर्चा पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी आणि दुग्धव्यवसाय पूर्णतः संरक्षित !

गोयल यांनी पुढे सांगितले की, मागील वर्षभरात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये विविध पातळ्यांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या हितांचा विचार करून संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले. चर्चांच्या वेळी भारतीय बाजूने विशेषतः कृषी आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांतील हितांचे यशस्वी संरक्षण केले. १ वर्षाच्या चर्चेनंतर द्विपक्षीय व्यापार करारातील विविध क्षेत्रांना अंतिम स्वरूप देण्यात आले.