वाशीत अभाविपच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा पार पडली !

नवी मुंबई – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि ‘युवक सप्ताह’ यानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नवी मुंबईच्या वतीने वाशी येथे एका तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आदर्श, त्यांचे शौर्य आणि बलीदान यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांमध्ये देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय दायित्वाची जाणीव निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे १ सहस्र १११ फूट लांबीचा तिरंगा या यात्रेमध्ये होता. नवी मुंबईतील २० हून अधिक शाळा आणि महाविद्यालये यांच्या सुमारे ३ सहस्र विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा तिरंगा खांद्यावर धरला होता. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तरुणांमधील उत्साह, शिस्त आणि राष्ट्रीय भावना या वेळी प्रकर्षाने दिसून आली. राष्ट्रनिर्मितीमध्ये तरुणांचा सहभाग आणि राष्ट्रीय चेतना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.