Senator Mark Warner : भारत-पाकिस्तान युद्ध ट्रम्प यांनी थांबवले नाही ! – अमेरिकेचे खासदार मार्क वॉर्नर

अमेरिकेचे खासदार मार्क वॉर्नर यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा !

मार्क वॉर्नर

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मे २०२५ मध्ये झालेला तणाव अल्प करण्यामध्ये अमेरिकेच्या भूमिकेचे विनाकारण उदात्तीकरण केले जात आहे. एकट्या अमेरिकेच्या मध्यस्तीने हा तणाव निवळला, याला सध्याच्या माहितीत कोणताही आधार नाही. मी भारत सरकारचे सदस्य, गुप्तचर यंत्रणा आणि ‘अमेरिकन इंटेलिजन्स कमिटी’ यांच्याकडून जे काही ऐकले आणि वाचले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की, हा विषय भारत अन् पाकिस्तान यांनी आपापसांत सोडवला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे प्रभावशाली खासदार आणि ‘सिनेट इंटेलिजन्स कमिटी’चे अध्यक्ष मार्क वॉर्नर यांनी माहिती देऊन डॉनल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे. मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी ट्रम्प यांनी ‘मी भारत आणि पाकिस्तान यांना युद्धापासून रोखले’, असा दावा केला होता.

वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत वॉर्नर म्हणाले की, परिस्थिती गंभीर होती; पण ती नवीन नव्हती. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये यापूर्वीही अनेकदा असा तणाव निर्माण झाला आहे. ही घटना एका परिचित पद्धतीनुसार घडली आहे. हे पुन्हा एकदा आतंकवादी घटनेशी संबंधित होते. सीमेपलीकडचा आतंकवाद ही दीर्घकाळापासूनची चिंतेची गोष्ट राहिली आहे. अशा प्रसंगांसाठी नवी देहली आणि इस्लामाबाद यांच्यात संवादाचे मार्ग आधीच उपलब्ध आहेत.

पाक भारताला नेहमीच उत्तरदायी धरतो !

पाकिस्तानवर टीका करतांना वॉर्नर म्हणाले की, पाकिस्तान नेहमी भारतावर आवश्यकतेपेक्षा अधिक लक्ष देतो आणि स्वतःच्या आर्थिक आव्हानांसाठीही भारताला उत्तरदायी धरतो. याउलट भारत आता या स्पर्धेच्या पुष्कळ पुढे गेला असून तेथील नवी पिढी अमेरिकेसमवेतच्या भक्कम संबंधांच्या बाजूने आहे.

युद्धविरामाचे श्रेय ट्रम्प यांना न दिल्यानेच ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लादले !

मार्क वॉर्नर यांनी चिंता व्यक्त केली की, अमेरिकेच्या भूमिकेचे अतिरंजित वर्णन केल्यामुळे मित्र राष्ट्रांमधील विश्वास दुर्बल होऊ शकतो. भारतासमवेतचा सध्याचा आयात शुल्क वादही याच अप्रसन्नतेतून निर्माण झाल्याचे दिसते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धविरामाचे पुरेसे श्रेय ट्रम्प यांना दिले नाही. ट्रम्प अनेकदा निकालांचे अतिरंजित वर्णन करतात. अशा भाषेमुळे राजनैतिक हानी होते आणि वॉशिंग्टन अन् नवी देहली यांच्यातील विश्वासाला तडा जातो. अमेरिकेची भूमिका मोठी करून सांगणे प्रादेशिक संतुलन अधिक गुंतागुंतीचे करू शकते आणि भारत-अमेरिका संबंध अस्थिर करू शकते, अशी चेतावणीही वॉर्नर यांनी दिला आहे.

इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट झालेली नाही !

इराणवरील अमेरिकी आक्रमणांचा उल्लेख करत वॉर्नर म्हणाले की, अमेरिकी  लढाऊ विमानांनी उत्तम कामगिरी केली; पण त्यांनी इराणची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट केलेली नाही. तेहरान काही महिन्यांत ती पुन्हा उभी करू शकते.