५१ वर्षांनंतर वक्फ मंडळाकडून गुरुविरक्त मठाला मालमत्ता परत !

सिंदगी (कर्नाटक) – वक्फ बोर्डाने बळकावलेली सिंदगी येथील गुरुबसव विरक्त मठाची कोट्यवधी रुपयांची १.३० एकर भूमी ५१ वर्षांच्या अथक संघर्षानंतर मठाला परत मिळाली आहे. गुरुबसव विरक्त मठ सेवा समितीचे सचिव निंगप्पा गुरुबसवप्पा पट्टणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना ही आनंदाची बातमी सांगितली.

१. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी शहरात सर्व्हे क्र. १०२० मध्ये असलेली १.२८ एकर विरक्त मठाची भूमी महसूल दस्तऐवजांमध्ये (पहाणी/आर्.टी.सी.) कर्नाटक सुन्नी वक्फ मंडळाची मालमत्ता म्हणून नमूद करण्यात आली होती.

२. यापूर्वी मठाचे पीठाधिपती असलेल्या सिद्धलिंगय्या स्वामीजींच्या काळात पहाणीतील ११ क्रमांकाचा रकाना रिकामा होता; मात्र वर्ष २०१८-२०१९ च्या काळात ही भूमी ‘कब्रस्तान वक्फ बोर्ड’ म्हणून पालटण्यात आली होती. हे बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच भक्तांनी तेव्हापासून संघर्ष प्रारंभ केला. तसेच याबद्दल अनेकदा आंदोलनेही केली होती.

३. विरक्त मठाची मालमत्ता वक्फ बोर्डापासून मुक्त करण्यासाठी ११ महिने वाद-प्रतिवाद झाले आणि अंततः श्री मठाची मालमत्ता परत मठाला मिळाली आहे. या मालमत्तेचा वक्फ बोर्डाशी कोणताही संबंध नाही, असा आदेश माननीय न्यायालयाने दिला आहे.

४. सिंदगी मठ हा सामान्य मठ नाही, तर शिक्षणक्षेत्रात मठाचे योगदान अतिशय मोठे आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने मठाने शाळा-महाविद्यालये स्थापन केली आहेत. ब्याडगी येथील श्री गुरु कुमारेश्वर धार्मिक पाठशाळेसह अनेक शिक्षण संस्था मठाच्या प्रशासनाखाली येतात. या संस्थांमध्ये सहस्रो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन भविष्य घडवले आहे.

संपादकीय भूमिका

देशात अशा सहस्रो एकर भूमी वक्फ मंडळाने बेकायदेशीररित्या बळकावलेल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी किती वर्षे संघर्ष करावा लागणार आहे, हे पहाता वक्फ मंडळ विसर्जित करून अशा भूमी संबंधितांना परत करणे आवश्यक झाले आहे !