पणजी येथे आणीबाणीविरोधी ५६ सत्याग्रहींचा सत्कार !

श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते सत्कार

छायाओळ – डावीकडून श्री. नितीन फळदेसाई, श्री. गंगाराम म्हांबरे, प्रा. सुभाष वेलिंगकर, श्री. प्रमोद मुतालिक, श्री. जयंत मिरिंगकर, डॉ. गोविंद देव आणि श्री. सुरेश काकोडकर

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – संभाजीनगर (वास्को) येथील श्रीविद्या प्रतिष्ठान या संस्थेकडून आणीबाणीच्या काळात अन्याय, दडपशाही आणि स्वातंत्र्य यांच्यावर झालेल्या आक्रमणाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहिलेल्या ५६ सत्याग्रहींचा २० नोव्हेंबरला श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुरगाव येथील श्रीविद्या प्रतिष्ठानच्या वतीने पणजी येथील क्राउन(झांट्ये) सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपिठावर श्रीविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, श्री. गंगाराम म्हांबरे, प्रा. सुभाष वेलिंगकर, श्री. प्रमोद मुतालिक, फोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयंत मिरिंगकर, भारत माता की जय संघटनेचे डॉ. गोविंद देव आणि कार्यक्रमाचे समन्वयक श्री. सुरेश काकोडकर उपस्थित होते.

उपस्थित सत्कारमूर्ती सत्याग्रही, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य लोक

कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘वर्ष १९७५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळच्या काँग्रेसच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांना पदच्युत करण्याचा आदेश दिला. तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणी म्हणजे कुठल्याच प्रकारचे स्वातंत्र्य नागरिकांना नव्हते. वर्तमानपत्रांवरही बंधने लादली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. लाखो लोकांना कारागृहात डांबले. गोव्यातही ६ स्वयंसेवकांना बंदी बनवण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी आणीबाणीविरोधी सत्याग्रहाला ५० वर्षे पूर्ण झाली. या कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांचे कार्य आजच्या पिढीला कळावे, यासाठी आयोजित करण्यात आला आहे.’’

कार्यक्रमाच्या प्रारंभी एक मिनिट शांतता पाळून मंत्र म्हणून निधन पावलेल्या सत्याग्रहींना श्रद्धांजली वहाण्यात आली. हयात नसलेल्या सत्याग्रहींच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांनी सत्कार स्वीकारला.

हिंदु समाजाला जागृत करणे आवश्यक ! – प्रमोद मुतालिक

श्री. प्रमोद मुतालिक

काँग्रेस सरकाने १०० हून अधिक वेळा राज्यघटनेत पालट केला. आणीबाणीवेळी मी, माझे वडील आणि भाऊ कारागृहात होतो. अनेक राष्ट्रप्रेमी, हिंदू यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. ही काँग्रेस देशातून नष्ट झाल्यावरच भारत देशाचा उद्धार होईल. १० वर्षांनी बंदी उठवल्यानंतर मला गोव्यात यायला मिळाले. गोव्यात रशियाचे, आफ्रिकेचे, बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानी चालतात; पण कर्नाटकातील माझ्यावर बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यावर मी येऊ शकलो.

गोहत्या, लव्ह जिहाद, गोरक्षकांना अटक हे सर्व थांबवण्यासाठी एकत्र येणे, जागृत रहाणे आणि हिंदु समाजाला जागृत करणे आवश्यक आहे. देश टिकला, तर आपण टिकू. सरकार जरी आपले असले, तरी प्रत्येक हिंदूने सावध रहायला हवे.