संयुक्त राष्ट्रे अजूनही जुन्या काळातच अडकली आहेत ! – S Jaishankar

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची सयुक्त राष्ट्रांवर टीका

परराष्ट्रमंत्री जयशंकर

नवी देहली – संयुक्त राष्ट्रे अजूनही १९४५च्या काळाचेच प्रतिबिंब दर्शवतात. विकसनशील देशांचा आवाज बुलंद करणे, हेच संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेचे खरे मोजमाप आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी येथे बोलतांना स्पष्ट केले. देहलीत नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी सैनिक पाठवणार्‍या देशांच्या परिषदेत ते बोलत होते. परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर पुढे म्हणाले,

१. ज्या संस्था काळानुरूप पालट घडवू शकत नाहीत, त्या कालबाह्य होण्याचा धोका असतो. संयुक्त राष्ट्रे प्रभावी करायची असतील, तर त्यात सुधारणा करावी लागेल. संयुक्त राष्ट्रांना अधिक समावेशक, लोकशाहीप्रधान आणि आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करणारे बनवावे लागेल.

२. संयुक्त राष्ट्रांतील सदस्य देशही पालटाची अपेक्षा करत आहेत. सुरक्षा परिषदेचा विस्तार होणेही आवश्यक आहे.

३. आमचे शांतता सैनिक बलवान दल आहे. मानवी साहाय्य पोचवण्यासाठी हे शूर पुत्र आणि कन्या त्यांचे प्राण धोक्यात घालतात. आज मी त्या ४ सहस्रांहून अधिक शांतता सैनिकांचे स्मरण करतो, ज्यांनी सर्वोच्च बलीदान दिले.