शिरोडा येथील प्रस्तावित मिठाचा सत्याग्रह स्मारकाची धारिका धूळ खात पडून

स्मारकाचे काम जलद गतीने होण्यासाठी २ ऑक्टोबरला उपोषणाची चेतावणी

डावीकडून दिगंबर परब, नारायण (बाबी) गावडे, सरपंच सौ. लतिका
रेडकर यांना निवेदन देतांना सुनील गावडे, संदीप गावडे आणि देवेश गावडे

वेंगुर्ला – तालुक्यातील शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या ठिकाणी वर्ष २०२२ मध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन पार पडला. त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी येथील मिठाचा सत्याग्रह स्मारकाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन माध्यमांसमोर ग्रामस्थांना दिले होते; परंतु दुर्दैवाने त्या दिवसापासून स्मारकाची धारिका धूळ खात पडली आहे. शासनाला, तसेच स्मारकाविषयी आश्‍वासन देणार्‍या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना स्मारक उभारणीचा पूर्णपणे विसर पडला आहे. या सर्व संबंधितांना जाग यावी आणि त्यांनी स्मारकासाठीच्या भूमीचे हस्तांतरणाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी शिरोडा पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीच्या दिवशी ‘मिठाचा सत्याग्रह स्मारका’च्या नियोजित ठिकाणी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे, तसेच शिरोडा गावच्या सरपंच सौ. लतिका रेडकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

या वेळी सर्वश्री सुनील गावडे, संदीप गावडे, देवेश गावडे,  नारायण (बाबी) गावडे, दिगंबर परब आदी उपस्थित होते.