मातृभूमीविषयी प्रेम आहे किंवा नाही ?, हे समजण्यासाठी मंदिरे आणि मशिदी येथे राष्ट्रगीत लावा ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

  • पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विधान

  • देहली ते वृंदावन ‘सनातन हिंदू एकता’ पदयात्रा काढणार !

  • वृंदावनात २०० हून अधिक संतांची बैठक पार पडली !

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

मथुरा – कुणाला या मातृभूमीविषयी प्रेम आहे आणि कुणाला नाही ?, हे समस्त भारतियांना समजण्यासाठी मंदिरे अन् मशिदी येथे राष्ट्रगीत लावले पाहिजे, असे वक्तव्य बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले.

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे ७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देहली ते वृंदावन अशी १७० कि.मी. लांबीची ‘सनातन हिंदू एकता’ पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेच्या नियोजनासाठी वृंदावन येथील कृष्ण कृपा धाम आश्रमात २०० हून अधिक संतांची बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज, भाजपचे खासदार मनोज तिवारी आदी सहभागी झाले होते. या बैठकीत पदयात्रेची रूपरेषा, शिस्त आणि धार्मिक शिष्टाचार यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत उपस्थित संत

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘सनातनींना एकत्र आणण्याची ही आमची मोहीम आहे. मथुरेत श्रीकृष्णाची स्थापना करण्यासाठी ही यात्रा आहे. ही केवळ एक झलक आहे, खरा चित्रपट अजून शेष आहे. ही यात्रा सर्व सनातनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आहे. धर्मविरोधी शक्ती आपल्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत; पण सर्व संत आणि महापुरुष आपल्यासमवेत आहेत. ब्रज प्रदेशात मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालणे, यमुना नदी शुद्ध करणे आणि धार्मिक स्थळांवर राष्ट्रगीत वाजवणे, हे आमचे धोरण आहे. जोपर्यंत सर्व सनातनी एकत्र येत नाहीत, तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच रहातील.’’