China Water Bomb : चीन बांधत असलेले सर्वांत मोठे धरण भारतासाठी ‘वॉटर बाँब’ !

अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी व्यक्त केली भीती

प्रेमा खांडू

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – चीन ‘यारलुंग त्सांगपो’ या नदीवर बांधत असलेले  जगातील सर्वांत मोठे धरण, हा गंभीर चिंतेचा विषय आहे. कारण चीनने आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे कुणालाच ठाऊक नाही की, तो काय करील ? चीनपासून सैन्य धोक्यांखेरीज ही कोणत्याही अन्य समस्येपेक्षा अधिक मोठी समस्या आहे. हा आमच्या जीवनाच्या अस्तित्वाला सर्वांत मोठा धोका आहे. हे फारच गंभीर सूत्र आहे; कारण चीन याचा वापर एखाद्या ‘वॉटर बाँब’ सारखा करू शकतो, अशी भीती अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी व्यक्त केली.

ते ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ब्रह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये ‘यारलुंग सांगपो’ या नावाने ओळखले जाते.

मुख्यमंत्री प्रेमा खांडू पुढे म्हणाले की,

१. चीनने आंतरराष्ट्रीय जल वाटप करारावर स्वाक्षरी केली असती, तर काही समस्या नव्हती; कारण त्यामुळे हीच योजना भारतासाठी वरदान सिद्ध ठरली असती. याद्वारे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश जेथे ब्रह्मपुत्रा नदीला पावसाळ्यात येणारा पूर रोखता आला असता; परंतु चीनने स्वाक्षरी न केल्याने समस्या निर्माण होणार आहे.

२. समजा धरण बांधून पूर्ण झाले आणि त्यांनी अचानक पाणी सोडले, तर आमचे संपूर्ण सियांग क्षेत्र नष्ट होईल. यात आदीम जनजाती आणि त्यांच्यासारखे समुह त्यांची सर्व संपत्ती, भूमी तर नष्ट होईलच; पण मानवी जीवनाला विनाशकारी समस्यांचा सामना करावा लागेल. यासाठीच अरुणाचल प्रदेश सरकारने भारत सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर ‘सियांग अप्पर मल्टीपर्पज प्रोजेक्ट’ नावाचा प्रकल्प आखला आहे, जो संरक्षण यंत्रणा म्हणून काम करेल आणि जल सुरक्षा सुनिश्चित करेल.

३. चीनच्या या कृतीच्या विरोधात केंद्र सरकार केवळ विरोध नोंदवून शांत बसू शकत नाही. चीनला कोण समजावणार ? चीनला आपण आपले कारण सांगू शकत नाही. त्यापेक्षा आपण आपली सिद्धता केली पाहिजे. चीनचे धरण हिमालय पर्वतरांगांच्या विशाल खंडावर सिद्ध होत आहे. तेथून नदी अरुणाचल प्रदेशात प्रवाहित होण्यासाठी वळण घेते.