(‘एल्ईडी’द्वारे मासेमारी म्हणजे एल्ईडी दिव्यांचा उपयोग करून माशांना आकर्षित करून पकडण्याची पद्धत)
मुंबई, २८ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र राज्यात ‘एल्ईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एल्ईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीचे दिवे यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य राज्यांनीही बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिले. या वेळी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांसह देशातील विविध सागरी किनारे लाभलेल्या राज्यांचे सचिव उपस्थित होते.
देशातील मत्स्य व्यवसायवृद्धीविषयी विचारविनियम करण्यासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री राजीव रंजन यांच्या समवेत ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश या सागरी किनारा लाभलेल्या राज्यांच्या अधिकारांची २८ एप्रिल या दिवशी ताज हॉटेल येथे बैठक होती. बैठकीच्या वेळी राजीव रंजन यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील आवाहन केले.
या वेळी राजीव रंजन म्हणाले, ‘‘जगात मत्स्यव्यवसायामध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. देशाच्या मत्स्यव्यवसायात दुप्पट वाढ झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये देशातील मत्स्य उत्पादन ९४ लाख टन इतके होते. सद्यस्थितीत देशाचे मत्स्य उत्पादन १८४ लाख टन इतके वाढले आहे. वर्ष २०१४ मध्ये भारतातून ३० सहस्र कोटी रुपयांचे मत्स्य उत्पादन निर्यात होत होते. सद्यस्थितीत भारतातून ६० सहस्र ५२३ कोटी रुपयांचे मत्स्य उत्पादन निर्यात होत आहे. यामध्ये आणखीन वाढ होऊ शकेल. महाराष्ट्रासह भारतात ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांमध्ये एकूण ११४ सहस्र किलोमीटर मत्स्य उत्पादनक्षेत्र आहे. यामध्येही वाढ होऊ शकते. माशांच्या प्रजननकाळात मासेमारी होऊ नये, यासाठीही काळजी घ्यायला हवी. निर्यात वाढण्यासाठी मूल्यवर्धन आणि चांगले वेष्टन यांवर भर द्यायला हवा. छोट्या मासेमारांना प्रोत्साहन द्यायला हवे.’’