घुसखोरांच्‍या शोधासाठी साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार ! – सुरेश चव्‍हाणके, मुख्‍य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

महाराष्‍ट्र घुसखोरमुक्‍त करण्‍यासाठी ‘जनता एन्.आर्.सी. मोहीम’ !

(एन्.आर्.सी. म्‍हणजे जनता राष्‍ट्रीय नागरिक नोंदणी)

(डावीकडून) कर्नल (सेवानिवृत्त) नरेश गोयल, लेफ्‍टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, सुरेश चव्‍हाणके, रणजित सावरकर

मुंबई, ३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – भारतात अनुमाने १० कोटींहून अधिक रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत. त्‍यांतील १ कोटी घुसखोर महाराष्‍ट्रात आहेत. मुंबईमध्‍ये यांतील ४० लाख घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्‍यांमध्‍ये सहभागी आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ‘जनता एन्.आर्.सी.’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्‍या अंतर्गत घुसखोरांचा शोध घेण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी दिली. या अभियानाची माहिती देण्‍यासाठी ३ ऑक्‍टोबर या दिवशी यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठान येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत श्री. चव्‍हाणके बोलत होते. या वेळी स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे कार्याध्‍यक्ष श्री. रणजित सावरकर, लेफ्‍टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर, कर्नल (निवृत्त) नरेश गोयल उपस्‍थित होते.

या पत्रकार परिषदेला सैन्‍यदल, नौदल, नागरी सेवा दल यांसह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांनी उपस्‍थित राहून अभियानाला पाठिंबा दर्शवला. या वेळी श्री. सुरेश चव्‍हाणके म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्राच्‍या गृह विभागाच्‍या एका अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरांच्‍या विरोधात पोलीस ठाण्‍यांमध्‍ये १ सहस्रांहून अधिक गुन्‍हे नोंद आहेत. आसाममध्‍ये रहाणारे ३ लाख बांगलादेशी घुसखोर तेथील सरकारच्‍या कारवाईला घाबरून महाराष्‍ट्रात आले आहेत. महाराष्‍ट्रातील सर्व घुसखोरांनी राज्‍य सोडून निघून जावे. प्रत्‍येक जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय नागरिक नोंदणीची समिती सिद्ध आहे. या विषयी प्रत्‍येक जिल्‍ह्यात कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या आहेत. बंगाली असल्‍याचे सांगून बांगलादेशी घुसखोर महाराष्‍ट्रात रहात आहेत. त्‍यांची ओळख पटावी, यासाठी कोलकाता येथून १०० नागरिक महाराष्‍ट्रात येणार आहेत. त्‍यांच्‍या भाषेवरून घुसखोरांना ओळखून त्‍यांना स्‍थानिक पोलिसांच्‍या कह्यात देणार आहोत.’’

१८ सहस्र ४०० ग्रामपंचायतींना संपर्क !

नागरिकांना आवाहन करून ‘आपल्‍या आजूबाजूच्‍या परिसरात घुसखोर आहेत का ?’, हे पाहिले जाईल. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्‍याशी संपर्क करून आपल्‍या भागात घुसखोर आहेत का ?, याचा शोध घेतला जाईल. या अभियानासाठी आम्‍ही आतापर्यंत १८ सहस्र ५०० ग्रामपंचायती आणि ४४ सहस्र गावांना भेटी दिल्‍या आहेत. यामध्‍ये धार्मिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. राजकीय नव्‍हे, तर राष्‍ट्रहिताच्‍या दृष्‍टीने हा विषय पहायला हवा, असे श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी म्‍हटले.

अशी राबवली जाणार मोहीम !

प्रथम क्षेत्र निश्‍चित केले जाईल. त्‍यानंतर कार्यकर्त्‍यांचा संघ आणि वर्गवारी केली जाईल. त्‍यानंतर घुसखोरांनी स्‍वत: पुढे यावे, यासाठी आवाहन करण्‍यात येईल. मग शोधमोहीम राबवली जाईल. शोध लागलेली व्‍यक्‍ती घुसखोरच आहे ना ?, याची निश्‍चिती करून त्‍यांना देशाबाहेर घालण्‍यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अशा प्रकारे ६ टप्‍प्‍यांमध्‍ये मोहीम राबवली जाईल, असे श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी सांगितले.

संपर्क करा आणि आंदोलनात सहभागी व्‍हा !

www.JanataNRC.org’ या संकेतस्‍थळावर अभियानाची माहिती देण्‍यात आली आहे. अभियानात सहभागी होण्‍यासाठी आणि पाठिंबा देण्‍यासाठी ९२०९२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन श्री. चव्‍हाणके यांनी केले.

बांगलादेशातील घुसखोरांचा राष्‍ट्रविरोधी कारवायांमध्‍ये सहभाग आहे ! – राजेंद्र निंभोलकर, निवृत्त लेफ्‍टनंट जनरल

निवृत्त लेफ्‍टनंट जनरल श्री. राजेंद्र निंभोलकर

भारताची ४ सहस्र १९८ किलोमीटर सीमा बांगलादेशला जोडली आहे. भारतातून १९७ नद्या बांगलादेशमध्‍ये जातात. सीमाभागात असलेले जंगल यांमुळे बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. बांगलादेशातून भारतात आलेले घुसखोर हे आतंकवादी कारवायांमध्‍ये सहभागी आहेत. त्‍यांना त्‍याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते.

…तर घुसखोरांमुळेे भारतात गृहयुद्धाची वेळ येईल ! – रणजित सावरकर, कार्याध्‍यक्ष, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक

श्री. रणजित सावरकर

भारतात आलेल्‍या घुसखोरांना सहजरित्‍या आधारकार्ड प्राप्‍त होत आहे. आधारकार्डच्‍या आधारे घुसखोरांना देशाचे नागरिकत्‍व मिळत आहे. याचा मोठा परिणाम स्‍थानिकांच्‍या रोजगारावर झाला आहे. यापूर्वी राजस्‍थान आणि महाराष्‍ट्र येथील सुतारकाम करणारे नागरिक असायचे. सध्‍या सुतारकाम करणारे बांगलादेशी झाले आहेत. पूर्वी कोळी समाज करत असलेला मासेमारीचा व्‍यवसाय पूर्णत: बांगलादेशींनी बळकावला आहे. असेच चालू राहिले, तर येत्‍या १५-२० वर्षांत घुसखोरांमुळे भारतात गृहयुद्धाची वेळ येईल. या अभियानामध्‍ये सर्वसामान्‍यांनी सहभागी व्‍हायला हवे.