स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या ज्ञानेश महारावांसह आयोजकांवर गुन्हे नोंदवा !

धुळे येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रशासनास निवेदन !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – स्वामी समर्थांविषयी वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदनातून केली.

निवेदनात म्हटले आहे की, २२ ऑगस्ट २०२४ या दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृह (वाशी, नवी मुंबई) येथील ‘संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशना’त ज्ञानेश महाराव यांनी हेतूपुरस्सर स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केले. यामुळे स्वामीभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या अनुषंगाने ज्ञानेश महाराव यांच्यासह आयोजकांविरूद्ध कायदेशीर तक्रार देण्यात आली आहे.

निवेदनावर मयूर बागुल, विकी तारगे, पियुष खंडेलवाल, भावेश काळे, महेश माळी, मयूर शंकर निकम, माधुरी वराडे, कल्पना पाटील, सौ. शालिनी थोरात, शैलजा पालेकर, जयश्री वराडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संपादकीय भूमिका

हे भक्तांना का सांगावे लागते ? हिंदूबहुल राज्यातील पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?