ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हाच खरा उपाय ! – जयवंत कोंडविलकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मणीपूर

कार्यक्रमाला उपस्थित लोक

सांगली, २२ जून (वार्ता.) – ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणे, हाच खरा उपाय आहे. फुटीरवाद, धर्मांतर, परकीय अवैध पैशांचा महापूर यांवर आधारित ‘स्थानिक आतंकवाद’ यामध्ये गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या मणीपूरला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला सढळ हाताने साहाय्य करा आणि प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभागी व्हा, असे आवाहन ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’चे कार्यकारी संचालक श्री. जयवंत कोंडविलकर यांनी येथे केले.

‘लोकमान्य टिळक स्मारक मंदिरा’च्या शताब्दी वर्षानिमित्त येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे ‘धुमसते मणीपूर : अपप्रचार आणि वास्तव’ या विषयावर श्री. जयवंत कोंडविलकर यांचा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सौ. मनीषा काळे, डॉ. श्रीकांत ठाणेदार, सर्वश्री प्रकाश बिरजे, सौरभ गोखले, राजेश देशमाने, संतोष बापट, विनय पटवर्धन, हेमंत फाटक, ए.व्ही. कुलकर्णी, प्रकाश गोखले, धनंजय दिवेकर, शार्दुल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी त्यांनी मणीपूर येथील सद्य: परिस्थितीचा ऊहापोह करत ईशान्य भारतियांना राष्ट्रीयत्वाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन सुजाण नागरिक आणि राष्ट्र्रप्रेमी यांना केले. सध्या मणीपूर येथे शाळांच्या माध्यमातून तेथील युवा पिढीला राष्ट्रीयत्वाचा पाठ शिकवून राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. कार्यक्रमात लोकमान्य टिळक स्मारकाच्या वतीने ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला साहाय्य म्हणून रकमेचा धनादेश श्री. जयवंत कोंडविलकर यांना सुपुर्द करण्यात आला.

जयवंत कोंडविलकर यांचा परिचय…

द्वितीय सरसंघचालक दिवंगत गोळवलकरगुरुजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ईशान्य भारतात राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतलेले महाराष्ट्राचे भूमीwbत्र आणि स्वयंसेवक दिवंगत शंकर दिनकर (भैय्याजी) काणे यांनी कोकणातील जयवंत कोंडविलकर यांच्यासमवेत हे कार्य वर्ष १९७२ मध्ये चालू केले आहे. त्यांनी मणीपूर येथे वयाच्या १२व्या वर्षापासून वास्तव्य केले होते. गेली ५० हून अधिक वर्षे ते प्रयत्नशील राहून ईशान्य भारतातील फुटीरतावादी शक्तींना रोखण्यासाठी सकारात्मक आणि वैशिट्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून मणीपूर येथील सीमाभागात सध्या ३ शाळांमध्ये ५०० हून अधिक स्थानिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.