लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे पालट होण्याची शक्यता !

ज्योतिष अभ्यासक श्री. सिद्धेश्वर मारटकर यांचे प्रसिद्धी पत्रकातील भाकीत !

श्री. सिद्धेश्वर मारटकर

पुणे – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणीत महायुतीला मागील वेळेपेक्षा अल्प जागा मिळण्याची शक्यता असून २८ ते ३१ जागा महायुतीला आणि महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे, असे भाकीत पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे. लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी भाकीत केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळाचे रहाणार असून मोठे पालट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुढील काळात मोठ्या राजकीय व्यक्तींना कारावास होण्याची शक्यता राहील, असा भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

महाराष्ट्रात पक्षांतराच्या घटना वाढणार

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता असून भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व पालटण्याची शक्यता राहील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या लोकसभेतील सध्याच्या जागा कायम रहातील, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या काही जागा अल्प होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील, असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

ग्रहमान राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अनुकूल

वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि निकालाच्या वेळेचे ग्रहमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल असल्यामुळे एन्.डी.ए. आघाडीला ३५० हून अधिक जागा मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील. तसेच अमित शहा, नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे, काँग्रेस पक्षाला ६० ते ८० जागा मिळण्याची शक्यता असून ‘इंडिया’ आघाडीला १६० ते १८० जागा मिळण्याची शक्यता राहील, असे सिद्धेश्वर मारटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याआधीची भाकितेही खरी ठरली आहेत !

पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे वर्ष २०१९ मध्ये मुख्यमंत्री होतील, हे भाकीत वर्षभर आधी वर्तवले होते, तर जून २०२२ मध्ये ठाकरे सरकार अडचणीत येईल, याचे भाकीतही २०२१ च्या दिवाळी अंकातून वर्तवण्यात आले होते. मारटकर यांची अनेक राजकीय भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत.