Myanmar Sittwe : म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडत चालल्याने भारताने सिटवे येथील दूतावासातील कर्मचार्‍यांना हालवले !

३ भारतीय तरुणांचे झाले आहे अपहरण !

नवी देहली – भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये सैन्य आणि जनता यांच्यातील संघर्ष चिघळला असून तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. भारताने सांगितले की, तेथील अनिश्‍चित सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन म्यानमारच्या सिटवे येथील वाणिज्य दूतावासातून कर्मचार्‍यांना यंगून येथे हलवले आहे.

१. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. मंडाले येथील भारतीय वाणिज्य दूतावास कार्यरत आहे.

२. ३ भारतीय तरुणांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता जयस्वाल म्हणाले की, भारतीय दूतावास या प्रकरणी काम करत असून ते तरुण लवकरच मायदेशी परततील, अशी आशा आहे.

३. १ फेब्रुवारी २०२१ या दिवशी सैन्याने सत्ता बळकावल्यापासून म्यानमारमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी व्यापक हिंसक निदर्शने होत आहेत.