मराठा समाज निवडणुकीत रोष व्यक्त करील ! – मनोज जरांगे

मनोज जरांगे

पुणे – राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज स्वत:चा रोष व्यक्त करेल, अशी चेतावणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिली आहे. मनोज जरांगे हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर दौर्‍यावर होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि राज्य सरकारवर टीका केली. या दौर्‍याच्या वेळी मनोज जरांगे मराठा समाजाच्या वेगवेगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भेट घेतली.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी धोका दिला. सरकारने सगेसोयर्‍याची अधिसूचना काढली; मात्र त्याची कार्यवाही केली नाही. निवडणुकीसारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी. मी कोणताही उमेदवार दिला नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही; मात्र समाजाने ही निवडणूक हातात घेतली आहे. समाजाला ज्याला पाडायचा आहे, त्याला पाडेल.