समाजात वितुष्ट निर्माण करणार्‍या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही ! – विजय वडेट्टीवर, विरोधी पक्षनेते

विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर

मुंबई, २५ फेबुवारी (वार्ता.) – समाजा-समाजात, तसेच हिंदु मुसलमान यांच्यात वितुष्ट निर्माण करणार्‍या, शेतकर्‍यांविषयी अनास्था असणार्‍या, घोषणांची कार्यवाही न करणार्‍या घोटाळेबाज, कंत्राटदारांचे हित सांभाळणार्‍या, मतांसाठी जनतेचे हित खड्ड्यात घालणार्‍या फसव्या, खोटारड्या, लायक नसलेल्या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही, असे सांगत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या चहापानावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बहिष्कार घातला. विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक नाही. सत्ताधारी आमदारांचे चोचले पुरवणे, विरोधी पक्षांचा निधी वळवणे असे चालू आहे. सत्ताधारी आमदारच गोळ्या झाडतात. गुंडांचा हैदोस चालू आहे. २०० गुंडांची परेड काढली. २ सहस्र २०० कोटींच्या ड्रग्स प्रकरणात तेच आहेत. त्यांना राजाश्रय मिळतो. संस्कारक्षम महाराष्ट्र ही ओळख खड्ड्यात घालण्याचे काम सरकारमधील ३ पक्ष करीत आहेत. जे भाव वर्ष २०१६ मध्ये कापूस उत्पादकांना मिळाले, तितकेही वर्ष २०२३ मध्ये मिळत नाहीत. दुधाला प्रतिलिटर ५ रुपये देण्याचे आश्वासनही पाळले नाही. संत्रा उत्पादकांना अनुदान नाही. धान उत्पादकांना दमडीही नाही. तलाठी भरतीप्रक्रियेत ३० लाखांचे व्यवहार झाले. मराठा आंदोलन नेते जरांगे पाटील यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्याची चौकशी व्हावी.