(म्हणे) ‘शेतकर्‍यांना शत्रूसारखी वागणूक देणार्‍या सरकारला धडा शिकवा !’

नक्षलवाद्यांकडून पत्रकाद्वारे आवाहन !

नक्षलवादी

गडचिरोली – विविध मागण्यांसाठी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना शत्रूसारखी वागणूक देणार्‍या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करणारे पत्रक नक्षलवाद्यांनी प्रसारित केले आहे. यासह त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नक्षलवाद्यांच्या ‘दंडकारण्य स्पेशल झोनल समिती’चा प्रवक्ता विकल्प याने हे पत्रक काढले आहे.

पत्रकात म्हटले आहे की,

१. किमान आधारभूत किंमत कायदा, स्वामिनाथन् आयोगाची कार्यवाही, कर्जमाफी, २०१३ भूसंपादन कायदा रहित करणे, अशा एकूण १३ मागण्यांसाठी राजधानी देहलीकडे येणार्‍या शेतकर्‍यांना देहली, पंजाब आणि हरियाणा येथील सीमांवर रोखण्यात आले आहे.

२. शेतकर्‍यांना शत्रूसारखी वागणूक देण्यात येत आहे. आंदोलन दडपण्यासाठी गोळीबार केला जात आहे. त्यांना आतंकवादी आणि देशद्रोही म्हणून संबोधण्यात येत आहे. आदिवासी भागातही अशीच दडपशाही चालू आहे. त्यांचे पाणी आणि भूमी यांवर अतिक्रमण करण्यात येत आहे. १६ फेब्रुवारीच्या ‘भारत बंद’लाही नक्षलवाद्यांनी समर्थन दिले होते. त्याचा उल्लेखही पत्रकात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • नक्षलवादी आणि खलिस्तानवादी शक्ती कशा प्रकारे हातात हात घालून काम करत आहेत, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. अशा देशद्रोही शक्तींच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारी स्तरावरून कठोरात कठोर प्रयत्न झाले पाहिजेत !