संपादकीय : भारताचा ‘ग्लोबल डीप स्टेट’ !

भारत स्वतंत्र झाला, तेव्हा येथील बहुसंख्यांक हिंदूंच्या भावनांचा विचार करून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे अपेक्षित होते; परंतु ते होऊ दिले गेले नाही. पुढे २८ वर्षांनी आणीबाणीच्या काळात भारत घटनात्मकरित्या धर्मनिरपेक्ष झाला. आता ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दानुसार तरी हिंदूंवरील अन्यायाला चाप बसायला हवा होता; परंतु तसे न होता उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमान आणि अन्य अल्पसंख्यांक समुदाय यांचे लांगूलचालन अव्याहतपणे चालूच राहिले. वर्ष १९९१ मधील ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ असो अथवा ‘वक्फ कायदा १९९५’ ! हिंदु धर्म आणि हिंदू यांना मुळापासून उपटून काढणारी ही सरकारी व्यवस्थाच होती. वर्ष २००९ मध्ये झालेल्या ‘शिक्षणाचा अधिकार कायद्या’न्वये हिंदु शैक्षणिक संस्थांना नष्ट करण्याचा घाट तत्कालीन ‘रिमोट कंट्रोल’ सरकारने घातला. या कायद्याविषयी तशी विशेष चर्चा होत नाही. त्यामुळे त्याचा ओझरता उल्लेख का असेना, तो करणे क्रमप्राप्त आहे. प्रसिद्ध वैज्ञानिक आणि हिंदुत्वनिष्ठ आनंद रंगनाथन् सांगतात की, या कायद्यातील नियम हे केवळ हिंदू चालवत असलेल्या शाळांना लागू होतात. थोडक्यात हिंदुविरोधी शिक्षण देणारी इस्लामी विद्यालये असोत अथवा हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या कॉन्व्हेंट शाळा असोत, त्यांना हे नियम लागू नाहीत. हिंदु शाळांमध्ये २५ टक्के मुले ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबियांतील असणे बंधनकारक आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च हिंदूंच्या शाळांनीच उचलला पाहिजे, असा त्याचा सरळसरळ अर्थ ! हिंदु शाळांनी विद्यार्थ्यांकडून ‘डोनेशन’ (देणगी) घेता कामा नये. दुसरीकडे शाळांना लागणारे सरकारी अनुदान, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांचे वेतनही कधीच वेळेत होत नाही. असे करून या शाळा एक दिवस कर्जाच्या ओझ्याखाली बंद करण्यासाठीच जणू या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. ही उदाहरणे म्हणजे हिमनगाचे टोक ! तात्पर्य, गेली ७५ वर्षे हिंदूंची त्यांच्याच देशात ससेहोलपट चालू आहे. यामागे साम्यवादी, समाजवादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, पाकधार्जिणे, पाश्चात्त्यांचा अनुनय करणारी आदी अनेक मंडळी आहेत. त्यांच्या जोडीला रशियाची तत्कालीन गुप्तचर संघटना ‘केजीबी’, इंग्लंडची गुप्तचर संघटना ‘एम्आय ५’ आदींची नावेही विसरता कामा नयेत. हाच आहे भारताचा ‘ग्लोबल डीप स्टेट’ ! या ‘डीप स्टेट’मुळेच ‘जे.एन्.यू.’सारख्या उपद्रवी विश्वविद्यालयांची निर्मिती होते. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ या पिढीचा बाप हा ‘डीप स्टेट’च ! केवळ राजकारणच नाही, तर प्रशासकीय सेवा, न्याययंत्रणा, शिक्षण, इतिहास, विज्ञान, उद्योग, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीयत्वाचा द्वेष करणार्‍या लोकांचा भरणा आहे. तो आजही हिंदूंना सतावत आहे. हिंदूंच्या हत्या करत आहे. रक्तरंजित ‘डीप स्टेट’चे हे समष्टी रूप होय. ‘डीप स्टेट’ला पुढे रेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना हाताशी धरले जाते. त्यामुळे ती याचा अविभाज्य घटक बनतात. हिंदूंना स्वत:सह या देशाचा धर्म, संस्कृती, परंपरा आदींचे रक्षण करण्यासाठी या शब्दांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

खरी सरकारे !

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ‘डीप स्टेट’ या शब्दाचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत क्लिंटन समर्थक शक्तींनी ट्रम्प यांचा पराभव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या प्रकाराला ‘डीप स्टेट’ म्हणता येईल. या शब्दाचा अर्थ त्याच्यातच लपला आहे. एका राज्याला (देशाला) चालवणारी अंतर्गत (‘डीप’ म्हणजेच सखोल) राज्यव्यवस्था अशी त्याची साधी सरळ व्याख्या ! थोडक्यात सामान्य जनतेला वाटते की, अमुक पक्षाचे सरकार आपल्यावर राज्य करत आहे; परंतु वास्तविक राज्य हे अन्य कुणीतरीच करत असते. ‘स्टेट विदिन अ स्टेट’ म्हणजे राज्यांतर्गत खरा राज्य करणारा वेगळाच असतो. इजिप्तचे लेखक अब्दुल अझीम अहमद यांनी वर्ष २०१३ मध्ये म्हटले होते, ‘‘वर्ष २०११ च्या इजिप्तच्या क्रांतीनंतर तेथील सैन्यव्यवस्थाच खरे सरकार चालवत होती. प्रशासकीय व्यवस्थेच्या आडून अलोकशाही नेते आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करू लागले. आज असे चित्र आहे की, जगातील कोणताच देश अशा ‘डीप स्टेट’पासून स्वत:ला वेगळा म्हणू शकत नाही.’’ पाकचे शासन तेथील सैन्य आणि ‘आय.एस्.आय.’ हेच चालवतात, हे उघड सत्य आहे. इंग्लंडच्या शाही कुटुंबाशी एकनिष्ठता ठेवणारी तेथील प्रशासकीय व्यवस्था हीच तेथील सरकार चालवते, असे स्वत: माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मान्य केले होते.

हिंदुद्वेषी सारीपाट !

भारतामध्ये वर्ष २०१४ पासून हिंदुत्वनिष्ठ निर्णय घेण्याचे प्रयत्न काही प्रमाणात चालू झाले. प्रस्थापित व्यवस्थेला हलवून सोडणारे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे काही अंशी साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदींचे धाबे दणाणले. यातूनच ‘पंतप्रधान मोदी हे भारताचे ‘डिव्हायडर-इन-चीफ’ आहेत’ (हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पाडणारे नेते आहेत), ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, ‘हिंदू बलात्कारी आणि असहिष्णू आहेत’, अशा प्रकारची गरळओक होऊ लागली. ही प्रस्थापित व्यवस्था प्रचंड सामर्थ्यवान आहे. या व्यवस्थेला जिहादी आतंकवादी, पाश्चात्त्य संस्था, सरकारे आदींचा पाठिंबा आहे. यातून ‘टूलकिट’सारखे प्रकार भारताला अस्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुका पहाता देशात प्रचंड उलथापालथ घडून येणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये संसदेवर झालेले ‘स्मोक बाँब’चे आक्रमण हा त्याचा एक इवलासा भाग ! राजधानी देहलीत घुसू पहाणार्‍या शेतकर्‍यांमागील अदृश्य हात हे वेगळेच आहेत. हे सर्व ‘ग्लोबल डीप स्टेट’च्या आडून घडवले जात आहे. जे देश आणि आर्थिक संस्था अथवा आस्थापने यांना भारतात मोदी यांचे सरकार खटकते, ते सुनियोजितपणे हे काम करत आहेत. कॅनडा, अमेरिका आणि पाकिस्तान येथे होणार्‍या भारतद्वेष्ट्या लोकांच्या हत्येसाठी भारताला उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न हा या भारतद्वेषी सारीपाटावरील एक खेळच आहे. ही व्यवस्था महाकाय असून तिच्यात संपूर्ण देशाला नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हिंदूंनी या ‘ग्लोबल डीप स्टेट’शी दोन हात करण्यासाठी सर्वांगांनी सक्षम होणे आवश्यक आहे.

श्री रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यांची कृपा कार्यरत झाली आहे. आता आवश्यकता आहे हिंदूंनी पुरुषार्थ गाजवण्याची ! काही वर्षांपूर्वी एका संतांनी सांगितले होते, ‘प्रत्येक कुटुंबातील एक हिंदु मेल्याविना म्हणजे १० कोटी हिंदु मारले गेल्यावरच हिंदू जागृत होतील !’ ही स्थिती भयावह आहे. असे होऊ द्यायचे नसेल, तर श्रीरामकृपेच्या जोरावर हिंदूंनी खडतर प्रवासास सिद्ध झाले पाहिजे. असीम त्याग, दुर्दम्य आशावाद, अलौकिक समर्पण आणि साधना यांच्या जोरावर हिंदू कोणत्याही ‘डीप स्टेट’ला नष्ट करण्यास सक्षम आहेत, हे हिंदुद्वेष्ट्यांना दाखवून देण्याचा हा काळ आहे. हिंदूंनो, जागे व्हा !

हिंदुद्वेष्ट्या सारीपाटाला नष्ट करण्यासाठी हिंदूंनी श्रीरामकृपेने पुरुषार्थ गाजवणे काळाची आवश्यकता !