काँग्रेसचे पी.व्ही. नरसिंह राव : श्रीराममंदिर लढ्यामधील भूमिका बजावणारे एक अदृश्य सेनानी !

पी.व्ही. नरसिंह राव

काँग्रेसवाल्यांचा हिंदुद्वेषीपणा !

खरे तर नरसिंह राव यांनी पंतप्रधान असतांना काँग्रेसच्या निधर्मीपणाचा भाग म्हणून ‘प्रार्थनास्थळे कायदा’ (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट) केला होता. असे असले, तरी नरसिंह राव यांनी श्रीराममंदिराच्या प्रकरणी बजावलेल्या अप्रत्यक्ष भूमिकेवरून काँग्रेसवाल्यांनी पुढे कधीही त्यांना कोणताही मानसन्मान मिळवून दिला नाही. नरसिंह राव यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात सामान्य कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वहाण्याची अनुमती नव्हती. इतकेच नव्हे, तर कुटुंबियांच्या इच्छेनुसार राव यांचे पार्थिव घेऊन जाणारे लष्करी वाहन काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या घराशेजारच्या काँग्रेस मुख्यालयाच्या जवळ थांबवण्यात आले. त्या वेळी ते वाहन आत न घेता मुख्य प्रवेशदार बंद करण्यात आले. राव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासह अन्य नेते बाहेर आले; पण अखेरपर्यंत मुख्यालयाचे प्रवेशद्वार उघडले नाही. यातूनच काँग्रेसवाल्यांचे खरे हिंदुद्वेषी स्वरूप उघड होते !

(साभार : विविध संकेतस्थळे)

नुकताच माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पी.व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित झाला. पी.व्ही. नरसिंह राव यांनी श्रीराममंदिर लढ्यामध्ये एक वेगळी भूमिका बजावली आहे. याविषयीची माहिती देणारा लेख येथे देत आहोत.

६ डिसेंबर १९९२ हा जगाच्या इतिहासात अहिंसक रक्तविहीन क्रांती म्हणून गणला गेला. शतकाशतकांच्या गुलामीवर प्रहार करणार्‍या रामभक्त कारसेवकांचे ते शौर्य नाकारणे शक्यच नाही; पण ती क्रांती रक्तविहीन होण्यासाठी एक रामभक्त पडद्याआडून हालचाल करत होता. तो रामभक्त होता पी.व्ही. नरसिंह राव ! होय, जवाहरलाल नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते पंतप्रधान होते. त्यामुळे ‘सेक्युलर’ (निधर्मी) बनून स्वतःचे पंतप्रधान पदाचे आसन पक्के करायला ६ डिसेंबरला अयोध्येत होणारी कारसेवा होऊच नये’, अशी ‘समाजवादी पक्षा’चे मुलायमसिंह यादव आणि ‘जनमोर्चा’ पक्षाचे नेते विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासारखी योजना ते करू शकले असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर रामभक्त जमल्यावर काय होऊ शकते, याची नरसिंह राव यांना कल्पना होती. गुप्तचर यंत्रणांनीही त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती.

१. गुप्तचरांकडून सूचना मिळूनही बाबरी ढाचा पूर्ण पडेपर्यंत नरसिंह राव यांनी श्रीविष्णूचा अभिषेक करणे

६ डिसेंबरचे सर्व श्रेय तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना दिले जाते. असे असले, तरी ५ डिसेंबरपूर्वीही कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त करता येऊ शकत होते. राष्ट्रपती राजवट लावून काँग्रेसी दमनचक्र चालवणे शक्य होते; पण नरसिंह राव यांना ‘जुने मोडल्याविना नव्याची मुहूर्तमेढ शक्य नाही’, हे ठाऊक होते. नरसिंह रावांच्या गुप्त नियोजनानुसारच पहिल्या कारसेवकाने गुलामीच्या ढाच्याकडे धाव घेतली, तेव्हा तेथील पोलिसांनी हतबलतेची भूमिका घेतली. यामुळे पुढे शेकडो जणांनी त्या गुलामीच्या प्रतिकाकडे धाव घेतली. हे सर्व चालू असतांना नरसिंह राव यांच्याकडे दिवसभर ‘हॉटलाईन’चा दूरभाष खणखणत होता. पहिला ढाचा पडल्याची सूचना गुप्तचरांकडून आली, तेव्हा नरसिंह राव विराटपुरुषाचे वर्णन करणारे ‘पुरुषसूक्त’ म्हणत श्रीविष्णूच्या अभिषेकाला बसले; कारण ‘हॉटलाईन’ उचलली गेली असती, तर प्रशासन सक्रीय झाले असते. सूर्य मावळतीला चालला होता आणि गुप्तचर विभागाचा संदेश आला, ‘तिसरा गुंबदही (घुमट) धराशायी झाला.’

२. कल्याण सिंह यांचे त्यागपत्र !

हे सर्व झाल्याचे कळल्यानंतर ते आसनावरून उठले. ‘हॉटलाईन’वर तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे शंकरराव चव्हाण हे कारवाईसाठी एकदम सिद्धच होते. त्यांना ‘हॉटलाईन’वर थांबवून नरसिंह राव यांनी कल्याण सिंह यांना संपर्क साधला आणि म्हणाले, ‘‘तुम्ही त्यागपत्र द्या. एरव्ही सरकार बरखास्त करावे लागेल.’’ यानंतर ते शंकरराव चव्हाण यांना म्हणाले, ‘‘जे घडायचे होते ते घडून गेले. आता गृहमंत्री म्हणून शांतता प्रस्थापित करायचे प्रयत्न चालू करा.’’ अशा प्रकारे नरसिंह राव यांनी श्रीराममंदिर उभारणीतील अडथळा दूर केला होता.

(साभार : विविध संकेतस्थळे)