पुणे येथे शेकडो गुंडांची पोलिसांकडून ओळख परेड !

पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांची कृती !

छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा

पुणे – पुणे येथे अमितेश कुमार यांनी नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील गुंड टोळ्यांचे प्रमुख अन् टोळीतील अन्य गुंड यांना पोलीस आयुक्तालयात बोलावले होते. या वेळी अनुमाने २५० ते ३०० गुंड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात आले होते. या वेळी गुंडांची ओळख परेड घेण्यात आली. स्वत: पोलीस अधिकार्‍यांनी सर्व गुंडांना ‘पुण्यात काही गुन्हेगारी कृत्य घडले किंवा काही गडबड झाली, तर आधी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी तंबी दिली. पुण्यातील कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके इत्यादी गुंड उपस्थित होते. पोलिसांनी उपस्थित गुंडांकडून ‘यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही अथवा त्यात सहभागी होणार नाही’, असा अर्ज भरून घेतला. (असे केल्याने गुंड कधी स्वतः किंवा अन्य मार्गांनी गुन्हा करणार नाहीत, असे होऊ शकते का ? गुंडांच्या अशा वर्तनावर कुणी विश्वास ठेवेल का ? असे झाले असते, तर आतापर्यंत देश गुन्हेगारीमुक्त केव्हाच झाला असता ? – संपादक)

उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्यावर त्यांनी ‘शिंदे यांनी मला गुंड बनवले’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करतांना एक गुंड यांची छायाचित्रे संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केली आहेत. त्यानंतर काही गुंड मंत्रालयाच्या आवारातून जात असल्याचे ‘रील्स’ प्रसारित झाले होते. या पार्श्वभूमीवर पुणे येथील पोलिसांनी ‘कुख्यात गुंड घायवळ यांसह पुण्यातील अन्य गुंडही पोलिसांच्या नियंत्रणात आहेत’, हे दाखवण्यासाठी त्यांची परेड बोलावल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका :

पोलिसांना जर गुंड ठाऊक आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?