हिंदूंनो, रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

ग्रामदेवी मरीआईमातेच्या साक्षीने मु. वर्‍हाड (जिल्हा रायगड) येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार करतांना उपस्थित ग्रामस्थ

वर्‍हाड (जिल्हा रायगड) – ५ जुलमी इस्लामी पातशाह्यांना धूळ चारत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ ‘स्वराज्य’ नव्हते, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

श्री. सुनील कदम

भारतभूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. आपल्याला कुणी आंदण म्हणून हिंदु राष्ट्र देणार नाही, तर त्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून बंधूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे आपले ध्येय ठेवायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. समितीच्या कार्याविषयी समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी सांगितले. वर्‍हाड गावाची ग्रामदेवी मरीआई मातेच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार ग्रामस्थांनी केला.

‘सध्या भारतात जी काही हिंदुद्वेषी कोल्हेकुई चालू आहे, ती थांबवायची असेल, तर सनातन धर्मियांनी हिंदु राष्ट्राची सिंहगर्जना केली पाहिजे’, असेही श्री. सुनील कदम यांनी सांगितले.

विशेष

सर्वांनी एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकले, तसेच सभा झाल्यावर जिज्ञासूंनी वक्त्यांना भेटून हिंदु धर्म आणि धर्मशिक्षण यांविषयी चर्चा केली.

क्षणचित्रे

१. सभेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

२. गावातील युवकांनी सभा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.