महाराष्ट्रात एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारलेले नाही !

तत्कालीन केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयानुसार २५ राज्यांत स्वतंत्र महिला पोलीस ठाणी अस्तित्वात !

नागपूर – वर्ष २०१२ मधील देहलीतील निर्भया बलात्कार-हत्याकांडानंतर प्रत्येक राज्यातील शहर आणि जिल्हा येथे स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारण्यात यावे, असा निर्णय तत्कालीन केंद्रीय मंत्रालयाने दिला होता. प्रत्यक्षात महाराष्ट्रात एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारण्यात आलेले नाही. तमिळनाडूत सर्वाधिक १९९, तर उत्तरप्रदेशात ७१ स्वतंत्र महिला पोलीस ठाणी आहेत. राज्यात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अश्‍लील कृत्यांसह लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत; पण तरीही स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन झालेले नाही.

१. तमिळनाडू, उत्तरप्रदेश यांसह राजस्थान, बिहार अशा २५ राज्यांत स्वतंत्र महिला पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकारनेही नाशिक, नागपूर, मुंबई आणि पुणे शहरांत ही ठाणी चालू करण्याचा निर्णय घेतला होता; पण तो अजूनही कार्यान्वित झालेला नाही.

२. शहरातील अन्य पोलीस ठाण्यांत येणार्‍या महिलांच्या संदर्भातील सर्व तक्रारी या महिला पोलीस ठाण्यात वर्ग केल्या जातील. पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकांसह ठाणे अंमलदार, बीट मार्शल, वाहनचालक, गुन्हे शोध पथक आदी सर्व कामकाज महिला कर्मचार्‍यांकडे सोपवले जाईल.

संपादकीय भूमिका 

महाराष्ट्रात महिलांशी संबंधित अत्याचारांचे प्रमाण वाढते असल्याने अशी  पोलीस ठाणी उभारणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !