कर्नाटकातील मंदिरांत २२ जानेवारीला विशेष पूजा करण्यात चूक काय ?

काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री परमेश्‍वर यांचा प्रश्‍न !

काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – आम्ही हिंदू नाही का ? आमच्या पक्षात हिंदु धर्मीय नाहीत का ? राज्यातील मंदिरांमध्ये २२ जानेवारीला विशेष पूजा केल्यास त्यात चुकीचे काय आहे ?, असा प्रश्‍न राज्याचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी विचारला. काँग्रेस सरकारने राज्यातील ३२ सहस्र मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्याचा आदेश दिला आहे. त्यावर ते बोलत होते. ‘अयोध्या श्रीराममंदिरासाठी मी देखील देणगी दिली आहे. तो माझा वैयक्तिक विचार आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले. काँग्रेसने आधीच तिचे कार्यकर्ते आणि नेते यांना अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्यासाठी संमती दिली आहे; मात्र पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेत्या सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • राजकीय हानी होऊ नये, यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. काँग्रेसवाल्यांना खर्‍या अर्थाने हिंदु धर्माविषयी, मंदिरांविषयी आत्मियता असती, तर त्यांच्या कृतीतूनही ती नेहमीच दिसून आली असती !