कोल्हापूर-सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची संमती !

३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास २ सहस्र ३२८ कोटी रुपये जागतिक बँक देणार !

मुंबई – कोल्हापूर, सांगली भागांतील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाहाय्य करण्यास जागतिक बँकेने संमती दिली आहे. या प्रकल्पास जागतिक बँक २८० मिलियन डॉलर्स (सुमारे २ सहस्र ३२८ कोटी रुपये), तर राज्य सरकार १२० मिलियन डॉलर्स (सुमारे ९९८ कोटी रुपये) असे योगदान देणार आहे. एकूण ४०० मिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१२ सप्टेंबर २०१९ ला जागतिक बँकेच्या पथकाने पूरग्रस्त भागाची पहाणी केली होती आणि त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री  फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्याचसुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोर्‍यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगानेसुद्धा याविषयी पूरक अहवाल दिला होता. एकीकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणेसुद्धा यातून शक्य होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.