नव्‍या आईला छळणारे अपसमज आणि प्रसुतीनंतर करावयाचे प्रयत्न !

काही मासांपूर्वी बाळंतीण झालेली एक रुग्‍ण माझ्‍या समोर आली होती. अंगावर जुना, पुष्‍कळ ढगळा पोशाख, तेलकट आणि न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्‍याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी तिची वेशभूषा होती. क्षणभर माझा डोळ्‍यांवर विश्‍वास बसेना. एक चांगल्‍या कंपनीत अधिकारी पदावर असलेली ही मुलगी पूर्वी फारच चटपटीत आणि आकर्षक व्‍यक्‍तीमत्त्वाची होती. हीच रुग्‍ण गरोदरपणात यायची, तेव्‍हा किती नीटनेटकी, व्‍यवस्‍थित असायची ! छान कपडे व्‍यवस्‍थित अंगावर बसणारे, आकर्षक केशभूषा अगदी हलका मेकअप असायचा. कधी कधी आणि मुख्‍य म्‍हणजे चेहर्‍यावर सतत प्रसन्‍न भाव ! हिचे अचानक असे का व्‍हावे ?

१. प्रसुतीनंतरच्‍या ‘हार्मोन्‍स’मधील (संप्रेरकांच्‍या) पालटांमुळे औदासिन्‍य येण्‍याची शक्‍यता !

या महिला रुग्‍णाच्‍या निराश मनस्‍थितीचे कारण अगदी नैसर्गिक होते, ते म्‍हणजे प्रसुतीनंतरच्‍या ‘हार्मोन्‍स’मधील (संप्रेरकांच्‍या) पालटांमुळे येणारे औदासिन्‍य ! हे पुष्‍कळ सर्वसामान्‍य आहे; पण बर्‍याच वेळा आजूबाजूच्‍या लोकांच्‍या लक्षात येत नाही. अतीऔदासिन्‍यामुळे कधी कधी मानसोपचारांची अथवा समुपदेशनाची आवश्‍यकता भासू शकते. यात भर म्‍हणून प्रसुती झाल्‍यानंतरच्‍या काळात बर्‍याच वेळा घरचे आणि बाहेरचे लोक या नव्‍या आईला इतक्‍या अखंड सूचना देत असतात अन् तिचा आत्‍मविश्‍वास इतका खचवतात की, तिची मनस्‍थिती काय असेल ? याचा कुणी विचारच करत नाही.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

२. बाळंतिणीचा आहार विहार कसा असावा ?

नव्‍या आईला त्रासदायक अशा बर्‍याच गैरसमजुती अजूनही प्रचलित आहेत. भर उन्‍हाळ्‍यातही डोक्‍याला घट्ट रुमाल, अंगात स्‍वेटर, पायात मोजे यांची काही आवश्‍यकता नसते. त्‍यामुळे घामोळे आणि अन्‍य बुरशीजन्‍य त्‍वचेचे आजार होण्‍याची शक्‍यता अधिक असते, तसेच खोलीच्‍या खिडक्‍या दारे उघडी ठेवून मोकळी हवा आत खेळायला हवी. नैसर्गिक उजेड खोलीत यायला हवा. चांगले फिल्‍टरचे पाणी असेल, तर उगाच उकळलेले गरम पाणी तिने प्‍यावे; म्‍हणून अजिबात आग्रह करू नये. उकळलेले पाणी चवीला चांगले नसल्‍यामुळे मग या मुली पाणीच अल्‍प पितात. त्‍यामुळे त्‍याचे दुष्‍परिणाम होऊ शकतात. स्‍तनपान चालू असतांना आईने भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे.

प्रसुतीनंतर आईची प्रतिकारशक्‍ती थोडी न्‍यून असते. त्‍यामुळे थोडी काळजी घेणे, गर्दीत न जाणे, ताजे अन्‍न खाणे योग्‍य आहे; पण अतिरेक करायची अजिबात आवश्‍यकता नाही. पुष्‍कळ घरांमध्‍ये प्रसुती झालेल्‍या आईला नीट आहार दिला जात नाही. जेवणात व्‍यवस्‍थित पोळी अथवा भाकरी, भाजी, कोशिंबीर, फळे या सर्वांचा समावेश असायलाच पाहिजे. अतिशय बेचव आणि नीरस जेवण प्रसुती झालेल्‍या स्‍त्रीला देऊन घरचे तिला अजूनच उदास करू शकतात.

प्रसुतीनंतर १५ दिवसांनी बाळंतिणीची तब्‍येत चांगली असेल, तर प्रतिदिन संध्‍याकाळी गाडीतून बाहेर एक चक्‍कर मारणे, ही उत्तम कल्‍पना असू शकते. बाळाला सुद्धा दिवसभर फक्‍त पांढरे छत दिसत असते. संध्‍याकाळी बाळ कंटाळूनही अधिक रडते. आई दिवसभर बाळाची शी, शू आणि स्‍तनपान यांमध्‍येच मग्‍न असते अन् यांमुळेही ती कंटाळलेली असते. बाहेर एक चक्‍कर मारली की, आई आणि बाळ दोघांनाही ताजेतवाने वाटते.

३. प्रसुतीनंतर वाढलेल्‍या पोटाविषयीचे गैरसमज !

सर्वांत महत्त्वाचे, म्‍हणजे ‘आईने काहीही खाण्‍याचा आणि बाळाचे पोट बिघडण्‍याचा अथवा दुखण्‍याचा काही एक संबंध नाही’, हे आम्‍ही सांगून थकलो, तरी घरातील ज्‍येष्‍ठ मंडळी या शास्‍त्रीय सत्‍याकडे सोयीस्‍कर दुर्लक्ष करतात. यात अजून भर घालणारे लोक म्‍हणजे बाळ आणि बाळंतीण यांना बघायला येणारे पाहुणे ! ‘अगं, अजून एक बाळ आतमध्‍येच आहे कि काय ? केवढे पोट दिसत आहे तुझे ! बघ बाई, ‘सिझेरियन’ झाल्‍यामुळे असेल, आता असेच रहाणार ते !’ ज्‍या महिलेची नैसर्गिक प्रसुती (नॉर्मल डिलिव्‍हरी) झाली असेल, तिला ‘पोट बांधले नाही ना; म्‍हणून एवढे झाले आहे’, असे पटवले जाते.

यातील सत्‍य, म्‍हणजे नैसर्गिक प्रसुती किंवा ‘सिझेरियन’ या दोन्‍हींचा पोट दिसण्‍याशी काहीच संबंध नसतो. ज्‍या मुलींचा आधीचाच स्नायूंचा टोन चांगला असतो, त्‍यांचे पोट नंतर न्‍यून दिसते; पण साधारणपणे ६ मास ते १ वर्षाचा काळ पोट न्‍यून व्‍हायला लागतोच. यात जर बाळंतिणीवर तूप आणि इतर पुष्‍कळ उष्‍मांक (कॅलरीज) असलेल्‍या वस्‍तूंचा भडिमार करण्‍यात आला अन् वजन प्रसुतीच्‍या वेळेइतकेच राहिले, तर मग पोट दिसणारच. गर्भावस्‍था आणि प्रसुती या दोन स्‍थितींमधून गेलेल्‍या स्‍त्रीचे शरीर हे पालटणारच ! तो निसर्ग नियमच आहे आणि तो स्‍त्री अन् तिचा नवरा या दोघांनी स्‍वीकारायलाच हवा. कधी कधी नवरा सुद्धा ‘डॉक्‍टर, हिचे पोट बघा केवढे आहे ! कधी न्‍यून होईल ?’, असे प्रश्‍न रुग्‍णासमोरच आम्‍हाला (डॉक्‍टरांना) विचारून रुग्‍णाचे मनोधैर्य अजूनच खचवतो. इतका त्रास सहन करून एक सुंदर बाळ आपल्‍या पोटात वाढवून ते जन्‍माला घालणार्‍या बायकोवर तिच्‍या पालटलेल्‍या शरिरासह प्रेमच करायला हवे. नाही का ?

४. प्रसुतीनंतर करायच्‍या काही गोष्‍टी

अ. बाळंतिणीने पहिल्‍या दिवसापासून स्‍तनांना योग्‍य तो आधार ‘फीडिंग ब्रेसिअर’च्‍या साहाय्‍याने द्यायला हवा. नाही तर स्‍तन एकदा वाढलेल्‍या वजनाने ओघळले, तर नंतर काही उपाय करता येत नाही.

आ. आहारामध्‍ये भरपूर भाज्‍या, फळे, दूध, थोडाफार सुकामेवा, आळीव आणि डिंकाचे लाडू हे असावे; पण पुष्‍कळ साजूक तुपाचा मारा करू नये. सध्‍याच्‍या मुली गर्भावस्‍था आणि नंतरच्‍या काळात आधीच सुदृढ असतात, त्‍यांना या अतीउष्‍माकांची आवश्‍यकता नसते.

इ. अजून एक म्‍हणजे पोट बांधल्‍याने ते आत जात नाही, तर रुग्‍णाची चालण्‍याची पद्धत त्‍याने सुधारते. दीड मासांनंतर प्रत्‍येक स्‍त्रीने चालण्‍याचा व्‍यायाम चालू करावा. ३० ते ४५ मिनिटे प्रतिदिन चालण्‍याने शरीर पूर्ववत् होण्‍यास साहाय्‍य होते. प्रसुतीनंतरही प्रारंभीचा १० दिवसांचा काळ संपला की, स्‍त्रियांनी स्‍वतःकडेही जरा लक्ष देण्‍यास हरकत नाही. कपडे व्‍यवस्‍थित आणि केस नीट असतील, तर तिचा स्‍वतःचा आत्‍मविश्‍वास वाढेल अन् अधिक प्रसन्‍न वाटेल. बाळ आणि स्‍वतःच्‍या तब्‍येतीविषयीच्‍या शंका फक्‍त डॉक्‍टरांनाच विचाराव्‍यात. आजूबाजूच्‍या लोकांनी दिलेल्‍या अनाहूत आणि चुकीच्‍या सल्‍ल्‍यांकडे दुर्लक्ष करणे उत्तम !

ई. प्रसुतीनंतर मसाज करू शकतो; पण आई आणि बाळ या दोघांनाही धुरी देणे अयोग्‍य आहे. त्‍याने श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो.

उ. पोट आणि मांड्या यांवर पडणारे ‘स्‍ट्रेच मार्क्‍स’ (व्रण) हा अजून एक चिंतेचा विषय असतो. ते न्‍यून व्‍हावेत; म्‍हणून गर्भारपणातच काही ‘क्रीम्‍स’ पोट आणि मांड्या यांवर लावता येतात. त्‍यामुळे या व्रणांचे प्रमाण न्‍यून होते; पण तरीही प्रसुती नंतरच्‍या ६ मासांत हे व्रण फिकट होऊन पुष्‍कळ न्‍यून वाटायला लागतात. काही जणींना पूर्ण शरिरावर काळसरपणा आणि डाग आलेले असतात. उदा. मान, काखा, पोट; पण ६ मासांत हे प्रमाण आपोआप न्‍यून होते. त्‍याची काळजी करायची आवश्‍यकता नसते.

ऊ. ‘सिझेरिअन’ असो अथवा नैसर्गिक प्रसुती २ मासांनी पती-पत्नीचा शरीरसंबंध येण्‍यास हरकत नसते. अर्थात् बाळासह रात्रीचे जागरण, बाळाला दूध पाजणे, त्‍याची देखभाल आणि शरिरातील होर्मोन्‍समधील पालट यांमुळे नव्‍या आईला लैंगिक संबंधाची इच्‍छा थोडी न्‍यून असू शकते, हेही पतीने समजून घेऊन तिला मानसिक अन् शारीरिक आधार द्यायला हवा. याचसमवेत प्रसुतीनंतर दीड मासाने गर्भनिरोधकविषयीचा सल्लाही घेणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा पाळी आलेली नसली, तरी परत दिवस जाऊ शकतात. पुढे होणारा व्‍याप आणि मनस्‍ताप टाळण्‍याकरता या गोष्‍टीत वेळीच पाऊल उचललेले चांगले !

…आणि मग आपण लेखात प्रारंभीला वर्णन केलेल्‍या महिला रुग्‍णाचे तिचा नवरा आणि नातेवाइक यांचे अशा तर्‍हेने बौद्धिक प्रबोधन केल्‍यावर ती बरीच सावरली. अशा सगळ्‍या गोष्‍टींविषयी समजावून सांगितल्‍यावर ‘डॉक्‍टर, पुढच्‍या वेळी पूर्वीच्‍याच प्रसन्‍न चेहर्‍याने तुम्‍हाला भेटायला येईन, बरं का !’, असे आश्‍वासन देऊन ती दवाखान्‍याबाहेर पडली !!

– डॉ. शिल्‍पा चिटणीस-जोशी, स्‍त्रीरोग आणि वंध्‍यत्‍व तज्ञ, कोथरूड, पुणे. (२०.७.२०२३)