भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा !

सीमेवर उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचे संकल्पचित्र

मुंबई – भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर कुपवाडा येथे भारतीय सैन्यांच्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पूजन करून २० ऑक्टोबर या दिवशी हा पुतळा कुपवाडा येथे पाठवला जाणार आहे.

‘भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे, तेथे भूमीपूजन करण्यात आले होते. येत्या १० ते १२ दिवसांत हा पुतळा कुपवाडा येथे पोचेल. मार्गामध्ये बडोदा येथे, तसेच नवी देहली येथील महाराष्ट्र सदनामध्ये या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.

असा आहे पुतळा !

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने हा पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून भूमीपासून साडेसात फूट उंचीच्या चौथर्‍यावर उभारण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर येथील प्रतिकूल हवामानाचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा पुतळा सिद्ध करण्यात आला आहे.