(म्हणे) ‘इस्रायलने आतापर्यंत केलेल्या आक्रमणांचा निषेध केला गेला पाहिजे !’ – अदनान अबू अल् हैजा, पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत

पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांचे विधान !

अदनान अबू अल् हैजा

नवी देहली – कुठलाही संघर्ष वाईटच असतो; मात्र या वेळी हेही जाणण्याची आवश्यकता आहे की, हमासने इस्रायलवर आक्रमण का केले ? आपण काही वर्षे मागे जाऊन इस्रायलकडून करण्यात आलेल्या नरसंहाराकडेही पाहिले पाहिजे. आतापर्यंत इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये २६० हून अधिक लोकांची हत्या केली आहे. याची चर्चा कुणीच करत नाही. हमासच्या आक्रमणाचा निषेध करणार्‍यांनी इस्रायलचाही निषेध केला पाहिजे, असे विधान भारतातील पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू अल् हैजा यांनी केले.

हैजा पुढे म्हणाले की, आमच्या भूमीवर इस्रायलने नियंत्रण मिळवलेे आहे. तेथे वस्ती बनवली आहे. लोकांना कारागृहात डांबले आहे. यांविषयी कुणी विचार करत नाही. ५ सहस्र लोक इस्रायलच्या कारागृहात बंद आहे. आमचे ३०० प्रशासकीय लोक अटकेत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी उपोषण केले जात आहे. इस्रायलकडे त्यांच्या विरोधात पुरावे नसतांनाही त्यांना कारागृहांत डांबण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

इस्रायलने केलेले आक्रमण आणि जिहादी आतंकवाद्यांनी केलेला जिहाद यांत भेद आहे. हमासने आक्रमण करून ज्या पद्धतीने महिला, मुले आणि पुरुष यांच्यावर अत्याचार केले, तो अक्षम्य आहेत !