चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

राहुल गांधी यांच्या आरोपाला प्रत्युत्तर

लडाख – चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही, अशा शब्दांत  लडाखचे उप राज्यपाल आणि निवृत्त ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी ‘लडाखमधील मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे,’ या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे दु:साहस कुणी केल्यास, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आपले सैन्य सिद्ध आहे.

उप राज्यपाल मिश्रा यांनी म्हटले की, कुणाच्या विधानावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही; परंतु जी वस्तुस्थिती आहे, त्याविषयीच मी बोलत आहे. आपल्या सीमेवर मी प्रत्यक्ष पहाणी केली असून त्यावरून सांगू शकतो की, आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.