चेन्‍नई येथे ‘वेदिक सायन्‍स रिसर्च फाऊंडेशन’च्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘अखंड भारत निर्मिती’चा ठराव

कार्यक्रमात सनातन संस्‍थेचा सहभाग

कार्यक्रमाला उपस्‍थित जिज्ञासू

चेन्‍नई (तमिळनाडू) – ‘वेदिक सायन्‍स रिसर्च फाऊंडेशन’च्‍या वतीने प्रतिवर्षी देशाच्‍या फाळणीच्‍या दिनाच्‍या, म्‍हणजेच १४ ऑगस्‍ट या दिवशी ‘अखंड भारत निर्मिती’चा ठराव करण्‍याविषयीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम चेन्‍नईच्‍या टी. नगरमधील गुरुबालाजी कल्‍याण मंडपामध्‍ये आयोजित करण्‍यात आला. सनातन संस्‍थेच्‍या वतीने श्री. बालाजी  कोल्ला, श्री. जयकुमार आणि श्री. रामालिंगम हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी सनातन संस्‍थेच्‍या तमिळ भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीच्‍या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली. या कार्यक्रमात विविध संघटनांचे ३०० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

श्री. ओमपुलियुर जयरामन यांनी भाषणात चेन्‍नई येथील रा.स्‍व. संघाच्‍या कार्यालयात झालेल्‍या बाँबस्‍फोटात प्राण गमावलेल्‍या हिंदु योद़्‍ध्‍यांच्‍या बलीदानाविषयी विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधिवक्‍ता जसमित सिंह यांनी ‘पंजाबमधील अमली पदार्थांचा वापर, धर्मांतर, खलिस्‍तानच्‍या सूत्रामध्‍ये पाकिस्‍तानचा हात’ इत्‍यादी समस्‍यांविषयी मत व्‍यक्‍त केले. येथील लॉयला महाविद्यालयात चालू असलेल्‍या दुष्‍ट कारवाया उजेडात आणणारे तरुण पत्रकार श्री. अभिनव विनायक यांना ‘हरण स्‍मृती पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात आला. श्री. बालगौथमन यांनी अध्‍यक्षीय भाषणात तमिळनाडूला भेडसावणार्‍या समस्‍यांविषयी आणि सरकारच्‍या पाठिंब्‍याने कट्टरतावाद्यांच्‍या वाढत्‍या धोक्‍यांविषयी वक्‍तव्‍य केले.