स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विद्यार्थ्यांकडून जयघोष वदवून घेतल्याने शिक्षिकेला करावी लागली क्षमायाचना !

  • बंटवाळ (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !

  • मुसलमान पालक आणि राजकीय नेते यांच्या दबावाचा दुष्परिणाम !

स्वातंत्र्यवीर सावरकर

मंगळुरू (कर्नाटक) – बंटवाळ तालुक्यातील मंची येथील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर की जय’ अशी घोषणा दिल्यामुळे शिक्षिकेला क्षमायाचना करावी लागल्याची घटना समोर आली आहे. या शिक्षिकेने वर्गातील मुसलमान विद्यार्थ्यांकडूनही ही घोषणा वदवून घेतल्याने पालक आणि काही राजकीय नेते यांच्या दबावामुळे शिक्षिकेला क्षमा मागावी लागली.

१. शाळेत विद्यार्थ्यांनी सावरकरांचा जयघोष केल्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला होता. तो पाहून मुसलमान विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत येऊन याविषयी जाब विचारला. ‘तुम्ही मुसलमान विद्यार्थ्यांच्या तोंडून सावरकरांचा जयघोष का करवून घेतला?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

२. या वेळी मुख्याध्यापिकेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, ‘हा जयघोष मुद्दाम केला नव्हता. सर्व स्वातंत्र्यवीरांसह त्यांचादेखील जयघोष करण्यात आला. सावरकर स्वातंत्र्यवीर होते, असे पुस्तकांतून शिकवले जाते. मुलांच्या मनात राजकारण निर्माण करू नका’, असे समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र मुसलमान स्वीकारण्याच्या स्थितीत नव्हते. या वेळी राजकीय नेत्यांकडून दूरभाष करून मुख्याध्यापिकेवर दबाव आणण्यात आला. त्यामुळे नंतर शिक्षिकेला क्षमा मागावी लागली.

३. दुसर्‍या दिवशी शाळेत शिक्षक आणि पालक यांची बैठक बोलावण्यात आली. त्यात पालक आणि काही राजकीय नेते यांनी सदर शिक्षिकेवर टीका केली. त्या वेळी शिक्षिकेने सर्वांसमोर क्षमायाचना केली.

४. मुख्याध्यापिकेने शाळेतील जयघोषाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करणेही आता गुन्हा झाला आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना मान्य आहे का ?