‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ ३० ऑगस्टला ‘संस्कृतदिनी’ प्रदान करण्यात यावा !

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सरकारकडे मागणी

महाकवी कालिदास

मुंबई – ३० ऑगस्ट या संस्कृतदिनाच्या दिवशी (नारळी पौर्णिमा) संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी असलेला ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे. शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून हा पुरस्कार दिला जातो. याविषयी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना सुराज्य अभियानाकडून नुकतेच याविषयीचे निवेदन देण्यात आले आहे.

१. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने २७ जुलै २०१२ या दिवशी काढण्यात आलेल्या शासनाच्या निर्णयामध्ये ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

२. प्रत्यक्षात मात्र पुरस्कार चालू झाल्यापासून कधीही हा पुरस्कार संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर २-३ वर्षांचे पुरस्कार एकत्रित दिले जात आहेत. संस्कृतदिन जवळ आला आहे. त्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करून पुरस्काराच्या निकषाप्रमाणे योग्य व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

३. प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील ८ जणांना हा पुरस्कार दिला जातो.

…तर पुरस्कार आणि पुरस्कारार्थी यांचा सन्मान ठरेल ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान 

वर्ष २०२१ मध्ये मागील ३ वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले. संस्कृतदिन नारळी पौर्णिमेला येतो; मात्र हे पुरस्कार वर्षाच्या शेवटी डिसेंबर मासात दिले जातात. हा पुरस्कार संस्कृतदिनाच्या दिवशी आणि प्रतीवर्षी दिल्यास खर्‍या अर्थाने पुरस्कार आणि पुरस्कारार्थी यांचा सन्मान ठरेल.

संपादकीय भूमिका

  • वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये. सरकारने स्वतःहून अशी कृती करणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !