देशातील ७ राज्यांत पूरसदृश परिस्थिती ! 

  • उत्तराखंडमध्ये १५४ रस्ते बंद 

  • आसाममध्ये २२ सहस्र लोक बाधित

नवी देहली – देशातील ७ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे.

कर्नाटकात पावसामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला आहे.  उत्तराखंडमध्ये १५४ रस्ते बंद करण्यात आले आहेत. आसाममधील ६ जिल्ह्यांतील १२१ गावांतील अनुमाने २२ सहस्र लोकांना पुराचा फटका बसला आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर छिन्काजवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.

साधारण ५ घंट्यांतर तो चालू करण्यात आला. पुढील ४ ते ५ दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदात भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह ९ जुलैपर्यंत जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.