पेंडखळे (राजापूर) येथे सरपंचांवर कोयत्याने आक्रमण

राजापूर – ‘कुंपण का तोडले’ असा जाब विचारल्याने पेंडखळे गावचे सरपंच राजेश हरिचंद्र गुरव यांच्यावर कोयत्याने आक्रमण केल्याची घटना घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पेंडखळे गावचे सरपंच राजेश गुरव यांनी त्यांच्या जमीनीभोवती कुंपण घातले आहे. हे कुंपण दत्ताराम महादेव सुर्वे तोडत होते. त्यामुळे या प्रकारामुळे सरपंच गुरव यांनी सुर्वे यांना जाब विचारला. या वेळी दोघांमध्ये किरकोळ वादही झाला. त्यानंतर सुर्वे यांनी सरपंच गुरव यांच्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि खांद्यावर जखम झाली. घायाळ झालेल्या सरपंच गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हालवण्यात आले. या प्रकरणी राजापूर पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.