बांगलादेशने भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांची अतिरिक्त सुरक्षा काढली !

बांगलादेश ध्वज

ढाका (बांगलादेश) – भारतीय दूतावास आणि उच्च प्रशासकीय अधिकारी यांना अतिरिक्त सुरक्षाकवच यापुढे देण्यात येणार नाही, असा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल मोमेन यांनी ही घोषणा करतांना म्हटले की, आम्ही आमच्या करदात्यांचे पैसे राजदूतांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी खर्च करू शकत नाही. भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया आणि ब्रिटन यांच्या राजदूतांकडूनही अतिरिक्त सुरक्षा काढून घेतली जाणार आहे. ढाका येथील भारतीय दूतावासाने अजूनतरी या विषयावर भाष्य केलेले नाही.

१. ढाका पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, चार देशांव्यतिरिक्त इतर दूतावासांनीही अतिरिक्त संरक्षण देण्याची मागणी केली होती.

२. दुसरीकडे ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनुसार ढाका पोलिसांकडे मनुष्यबळाच्या न्यूनतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

३. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही दूतावासाला अतिरिक्त संरक्षण हवे असेल, तर ते खासगी आस्थापनांना पैसे देऊन अशी सेवा घेऊ शकतात.

४. वर्ष २०१६ मध्ये ढाक्यातील एका रेस्टॉरंटवर झालेल्या जिहादी आक्रमणात एका भारतीय तरुणीसह १७ विदेशी नागरिक ठार झाले होते. त्यानंतर ही अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या रक्षणाचे दायित्वही स्वीकाराचे नाही आणि त्यांना संरक्षणही पुरवायचे नाही, हे बांगलादेशचे धोरण हिंदुविरोधी आहे !