कपाळावर टिळा, घराबाहेर धर्मध्वज लावल्यास भारत हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारची लोकसंख्या १३ कोटी आहे. यांतील केवळ ५ कोटी लोक कपाळावर टिळा लावून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या घरांवर धर्मध्वज लावला, तर भारत हिंदु राष्ट्र बननण्याच्या दिशेने अग्रेसर होईल, असे आवाहन बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथील नौबतपूरमध्ये चालू असलेल्या हनुमंत कथेमध्ये उपस्थित लाखो हिंदूंना केले. या कथेचा हा चौथा दिवस होता.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,

१. आपल्या संस्कृतीचे रक्षण तुम्हाला स्वतःच करायचे आहे. यासाठी श्रीरामचरितमानसचा पाठ, कपाळावर टिळा आणि घराबाहेर धर्मध्वज प्रत्येक सनातनी व्यक्तीने लावला पाहिजे. घराबाहेर लावलेल्या धर्मध्वजामुळे हनुमंत स्वतः तुमचे रक्षण करील. ज्या घरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा होते, त्या घराचे रक्षण हनुमान करतात आणि घरातील सर्व आपत्ती दूर करतात.

२. माझा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प बिहारमध्ये पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. मी लोकांना जागे करण्यासाठी बाहेर पडलो आहे. जोपर्यंत लोक जागे होत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना जागे करत रहाणार आहे.