किराडपुरा दंगल एम्.आय.एम् आणि भाजपनेच घडवली ! – नसीम खान, नेते, काँग्रेस

नसीम खान, नेते, काँग्रेस

छत्रपती संभाजीनगर – एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे दंगलीनंतर ३४ दिवसांनी जागे झालेल्या काँग्रेसने हा आरोप केला आहे. ‘आम्ही राज्यपालांची भेट घेतली असून या दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. अजूनही या दंगलीचा अहवाल अद्याप आलेला नाही, हे राज्य सरकारचे अपयश आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

ते म्हणाले की, दंगल होऊन ३४ दिवस झाले आहेत; मात्र अजूनही या दंगलीविषयीचा अहवाल पोलिसांनी सादर केलेला नाही. दंगलीच्या आधी मासभर शहरात सभा घेऊन तणाव निर्माण करण्यात आला. सभांमध्ये प्रक्षोभक भाषणे देण्यात आली; मात्र अशी भाषणे करणार्‍यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी याविषयी हलगर्जीपणा दाखवला. त्या वेळी कारवाई झाली असती, तर पुढचा प्रकार टळला असता. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींद्वारे दंगलीची चौकशी झाली, तर या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

  • कोणतेही पुरावे सादर न करता झोपेतून जागे झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी दंगलीच्या ३४ दिवसांनंतर असे आरोप करणे हास्यास्पद आहे.
  • मुसलमानांच्या २ गटांत वाद होऊन त्यांनीच ही दंगल घडवली आहे, हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपवर आरोप करण्याऐवजी खान यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी.