नागरिकांनी देशातील किमान १५ पर्यटन ठिकाणांना भेट देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन !

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक मासाला आकाशवाणीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम ‘मन की बात’चा ३० एप्रिल या दिवशी १०० वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह देश-विदेशांत ४ लाख ठिकाणी प्रसारण झाले. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आदीदेखील विविध ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पर्यटनावर जोर दिला. भारतियांनी विदेशात पर्यटनाला जाण्याऐवजी स्वतःच्या राज्याच्या व्यक्तीरिक्त देशातील किमान १५ पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले.