मंगळुरू येथील पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांनी सांगितलेली श्रीमद्भगवद्गीतेतील काही मार्गदर्शक सूत्रे आणि त्यांचे विवरण !

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

 ‘हे गुरुदेवा, ‘लहानपणापासून संस्कृत शिकावे, श्रीमद्भगवद्गीता मुखोद्गत करावी’, अशी माझी इच्छा होती; परंतु मला तशी संस्कारमाध्यमे मिळाली नाहीत. तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करून मला सर्वकाही दिले. आता मी प्रतिदिन श्रीमद्भगवद्गीता वाचत आहे. तुमच्या कृपेमुळेच मी ती वाचू शकत आहे. तुमच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्यात मी न्यून पडते. सध्या मी गीतेतील अध्याय दुसरा (सांख्ययोग) वाचून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ‘श्रीमद्भगवद्गीतेतील वचनांचा साधकांना लाभ व्हावा’, यासाठी त्यांतील ४ वचनांचा (४ श्लोकांचा) अर्थ पुढे दिला आहे. 

१. श्रीमद्भगवद्गीतेतील काही मार्गदर्शक वचने !

अ. ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ६२

अर्थ : विषयांचे चिंतन करणार्‍या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की, त्याला क्रोध म्हणजे राग येतो.

आ. क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ६३

अर्थ : रागामुळे अत्यंत मूढता येते, म्हणजे अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की, बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.

इ. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ६४

अर्थ : अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

विवरण : अंतःकरण स्वाधीन ठेवणारा राग आणि द्वेष यांपासून मुक्त होऊन आपल्याला वश असलेल्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा अनुभव घेत अंतकाळी प्रसन्नता अनुभवतो.

ई. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, सांख्ययोग, अध्याय २, श्लोक ६५

अर्थ : अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते.

२. ‘मनुष्यात ‘कोप’ नावाचा महादोष कसा उत्पन्न होतो ? ‘कोप’ नावाच्या या विषाने अन्य दोष कसे निर्माण होतात ? त्यांना शोधायचे कसे आणि त्यांना मुळापासून कसे उखडून टाकायचे ?’, या ४ वचनांतून लक्षात येते.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

३. रामनाथी आश्रमातील बालसंस्कारवर्गात बालसाधकांना याविषयी शिकवले जाते. बालसाधकांना बालपणापासूनच असे संस्कार मिळाल्याने त्यांच्या निर्मळ हृदयात परमात्मा स्थिर होतो. हाच मोक्ष (आनंद) आहे.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु (वय ८६ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (१७.६.२०२२)

पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधकांची जाणवलेली वैशिष्ट्ये


१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीनुसार बालसंस्कारवर्ग घेतात. आश्रमातील बालसाधकांचे बोलणे ऐकून आपल्याला आनंद होतो.

२. हे बालसाधक अन्य मुलांपेक्षा वेगळे आहेत. या बालसाधकांच्या सहज बोलण्यातही आध्यात्मिक शब्द असतात, उदा. त्याग, अपेक्षा, अनुसंधान, भावजागृती, अंतर्मुखता, नकारात्मक विचार, दृष्टीकोन, कर्मफल, श्रद्धा, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन इत्यादी.

३. हे बालसाधक स्वतःचे निरीक्षण करतात. ते स्वतःकडून झालेल्या साधनेतील चुका आश्रमातील फलकावर लिहितात. ते स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना घेतात.

४. रामनाथी आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे या बालसाधकांची सहजतेने साधना होते.

५. त्यांनी संतांच्या मार्गदर्शनाचा अभ्यास केल्यास आणि पुढे संस्कृत भाषा शिकल्यास त्यांना श्रीमद्भगवद्गीता पाठ करणे सुलभ होईल.

६. रामनाथी आश्रमाच्या वातावरणात वाढलेली सात्त्विक मुले पुढे येणार्‍या हिंदु राष्ट्रात (रामराज्यात) उत्तम प्रजा म्हणून जगतील. ही मुलेच हिंदु राष्ट्राची संपत्ती असेल.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु (वय ८६ वर्षे), मंगळुरू (१७.६.२०२२)