शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यशासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी – शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यावर्षीचे ३५० वे वर्षे आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर पार पडणार आहेत. हा शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यासाठी विविध पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यशासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येतील. या निधीच्या माध्यमातून तिथी आणि दिनांकानुसार अशा दोन्ही राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले,

उदय सामंत

१. शिवराज्याभिषेकदिन सोहळा वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
२. रायगड किल्ला संवर्धनासाठी राज्यशासनाने प्राधिकरणाला ६०० कोटी रुपयांचा निधी आधीच दिलेला आहे. त्या माध्यमातून विविध विकासकामे चालू आहेत.
३. काही ठिकाणी पुरातत्व विभागाच्या अडचणी निर्माण झाल्याने काम संथ गतीने चालू आहे; मात्र याविषयी संबंधित विभागाशी बोलून विकासकामांना गती देण्याचे निर्देश देण्यात येतील.
४. सध्या राज्य सरकारने पोलीस विभागाला ‘सीसीटीव्ही’ बसवण्यासाठी ५० लाख रुपये दिले आहेत, तसेच बॅरिगेट्स बसवण्यासाठी दीड कोटी रुपये दिले आहेत.
५. गडावर आणि गडाच्या परिसरात पेंडॉल व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पाणी, कचर्‍याचे व्यवस्थापन, जिजाऊ समाधीची डागडूजी, रोपवे, मोबाईल्स रेंज विविध कामे चालू करण्यात येत आहेत.